Followers

Thursday, October 1, 2020

लोगोथेरेपी, अस्तित्ववाद व गांधीवाद

महात्मा गांधी स्वातंत्र्यपूर्व भारतीय राजकरणातील एक असं व्यक्तिमत्व आहे की त्यांचे आपण समर्थन करू शकतो, त्यांच्यावर टिका करू शकतो, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. भारतीय नेत्यांना हक्काचे राजकीय व्यासपीठ १८८५ साली मिळाले. परंतू १९२० पर्यंत भारतीय स्वातंत्र्याचा लढा विशिष्ट नेत्यांपर्यंतच मर्यादित असल्याचे जाणवते. त्याला काही कारणे सुद्धा होती. वर्तमानपत्रातून ब्रिटिश शासनावर टिका करणे, शस्त्र हाती घेऊन शासनावर दबाव आणणे सामान्य जनतेला शक्य नव्हते. त्यामुळे सामान्य जनतेचा स्वातंत्र्य लढ्यात आवश्यक तसा सहभाग झाला नव्हता. लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर भारतीय राजकरणात व कॉंग्रेसमध्ये महात्मा गांधींचे पाय पक्के होत गेले आणि भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याला आंदोलनाचे स्वरूप मिळाले. नवीन संकल्पना व नवीन पद्धतींचा अवलंब स्वातंत्र्य आंदोलनात होवू लागला.

१९४०-१९५० या काळात युरोपात 'अस्तित्ववाद' ही संकल्पना जोर पकडू लागली. भारतावर ब्रिटिश शासन असल्यामुळे युरोपात उदयास आलेल्या संकल्पना झिरपत-झिरपत भारतात येऊ लागल्या. किर्कगार्ड, दास्त्रावस्की, नीत्शे या तत्ववेत्त्यांनी अस्तित्ववादावर भरपूर विवेचन केले. पण त्यानंतर आलेल्या विक्टर फ्रॅंकल या मनोचिकित्सकाने अस्तित्ववादावर जे लिखाण केले, ते अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीचे होते. त्यांनी आपल्या 'मॅन्स सर्च फॉर मीनिंग' या पुस्तकात 'लोगोथेरेपी' विषयी लिखाण केले. मनुष्याच्या जीवनच्या अस्तित्वाचा शोध घेणारी ही एक उपचार पद्धती आहे. 'अस्तित्ववाद' या संकल्पनेचे विवेचन करतांना विक्टर फ्रॅंकलने लोगोथेरेपीचा आधार घेतला आहे. लोगोथेरेपीमध्ये मनुष्याला स्वतःच्या कर्तव्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला जातो. 'मानवाला कर्तव्यनिष्ठ बनवणे' हा या लोगोथेरेपीचा हेतू आहे, असं सुद्धा आपण म्हणू शकतो.

भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला आंदोलनाचे स्वरूप मिळण्यासाठी आणि भारतीय समाजात अस्तित्ववादाचा शिरकाव होण्यासाठी गांधीवादी विचारधारेचा खूप महत्वाचा वाटा आहे. पहिल्या परिच्छेदात लिहिल्याप्रमाणे १९२० पर्यंत सामान्य जनता पूर्णपणे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाली नव्हती. पण महात्मा गांधींच्या आंदोलनामुळे सामान्य लोकांना त्यांच्या अस्तित्वाची व कर्तव्याची जाणीव झाली आणि जो माणूस बंदूक धरण्यास घाबरत होता, तो हातात मीठ घेऊन स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाला. त्यामुळे स्वातंत्र्य आंदोलन हे जनआंदोलन झाले. सामान्य लोकांना त्यांच्या अस्तित्वाची व शक्तीची जाणीव होण्यासाठी गांधीवाद व गांधी आंदोलन महत्वाचे ठरले. कर्तव्याच्या वाटेने अस्तित्वाचा शोध घेणारी लोगोथेरपी होती आणि कर्तव्य व अस्तित्वाची जाणीव करून देणारी गांधीवादी विचारधारा होती. त्यामुळे लोगोथेरेपी, अस्तित्ववाद व गांधीवाद या संकल्पना कुठेतरी जुळतांना दिसतात. वर-वर बघता सर्व विचारधारा आपल्याला भिन्न दिसतात परंतू सर्वांच्या मुळाशी एकच संकल्पना असते ती म्हणजे अस्तित्व. जगातली प्रत्येक विचारधारा, प्रत्येक क्रांती, चळवळ, आंदोलन या सर्वांच्या मुळाशी अस्तित्वाची लढाई असल्याचे जाणवते. त्यामुळे 'लोगोथेरेपी' व 'गांधीवाद' यांचा जन्म होण्यासाठी सुद्धा 'अस्तित्ववाद' ही संकल्पना कारणीभूत ठरली आहे, असं आपण म्हणू शकतो.

© गंधार विश्राम कुलकर्णी
संपर्क - ९१५८४१६९९८

5 comments:

  1. लोगोथेरपी, अस्तित्ववाद यांच्या सोबत गांधींंची सांगड घालण्याचा छान प्रयत्न ...

    ReplyDelete
  2. अभ्यासपूर्ण लेखन 👌

    ReplyDelete