दरवर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्य मे महिन्यात जगभरात विविध व्याख्यानमालांचं आयोजन होत असतं. त्यातून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनातील विविध टप्प्यांची सविस्तर चर्चा होत असते. बालपण, तारुण्य, क्रांतिकार्य, अंदमानातील वास्तव्य, रत्नागिरीतील सामाजिक व राजकीय कार्य अशा अनेक विषयांवर शेकडो वक्ते दरवर्षी बोलतात. विविध कार्यक्रम, स्पर्धा, साहित्य या माध्यमातून सावरकरांच्या जीवनावर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून प्रकाश टाकण्याचे कार्य सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यातून क्रांतिकारक सावरकर, राजकारणी सावरकर, इतिहासकार सावरकर, भाषाशुद्धीची चळवळ चालवणारे सावरकर, समाजसुधारक सावरकर अशा विविध रूपांमध्ये आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांना बघतो. परंतू स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू आपल्याला माहीत नसतात. उदाहरणार्थ कवितांतून व्यक्त होणारे तत्वज्ञ सावरकर. आपल्याला सावरकरांच्या निवडक दोन-तीन कविता माहीत आहेत. त्यातही ज्या कवितांना भारताचं भूषण असलेल्या मंगेशकर परिवाराने चाल लावून गीतांचं रूप दिलं अशाच कविता आपल्याला परिचित आहेत. कदाचित वाचायला आणि समजायला कठीण असल्यामुळेही इतर कविता अभ्यासण्याचे कष्ट आपण घेत नाही. सावरकरांच्या कवितांची पार्श्वभूमी समजावून घेण्यासाठी माझे प्रयत्न सतत सुरूच होते आणि अशातच एका व्याख्यानाची माहिती मिळाली. 'महाकवी सावरकर' या विषयावर महाराष्ट्रातील ज्येष्ठ निरूपणकार आशुतोषजी अडोणी यांच्या व्याख्यानाचे आयोजन झाले होते. आता याला भगवंताची कृपा म्हणावी की योगायोग म्हणावा ते आपण ठरवावं. अडोणी सरांचं 'महाकवी सावरकर' हे व्याख्यान मला सावरकरांच्या कवितेतील सौंदर्य आणि तत्वज्ञान समजण्यास मार्गदर्शक ठरलं.
सावरकरांच्या कविता म्हणजे त्यांचं जीवन. त्यामुळेच फक्त त्यांच्या कवितांचा अभ्यास केला तरी आपल्याला सावरकरांच्या जीवन चरित्राची बऱ्यापैकी ओळख होवू शकते. हे सुद्धा सावरकरांच्या कवितांचं वैशिष्ट्यच म्हणावं लागेल. वयाच्या ११ व्या वर्षापासून सावरकरांनी कविता रचण्यास प्रारंभ केला आहे. सुरवातीला सावरकरांनी अनेक व्यक्तींवर कविता रचल्या. त्यात सवाई माधवराव, लोकमान्य टिळकांचे व्याही बापूराव केतकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कविता रचली. पुढे फर्ग्युसन महाविद्यालयात गेल्यावर तारुण विनायकाने भरपूर कविता लिहिल्या. त्यातली एक अतिशय महत्वाची कविता म्हणजे 'श्री शिवरायांची आरती'.
'त्रस्त अम्ही दीन अम्ही शरण तुला आलों
परवशतेच्या पाशीं मरणोन्मुख झालों
साधु परित्राणाया दुष्कृती नाशाया
भगवन् भगवद्गीता सार्थ कराया या
जयदेव जयदेव जय जय शिवराया'
या कवितेत सावरकर शिवाजी महाराजांना पुन्हा जन्म घेण्याची विनवणी करतांना दिसतात. जेव्हा देशावर प्लेगची आपत्ती ओढवली होती. तेव्हा त्रस्त जनतेचं दुःख 'विधवांची दुःखे' या कवितेतून सावरकरांनी मांडलं. पण सावरकर फक्त दुःख मांडून थांबत नाहीत तर 'बालविधवांना पुनर्विवाहाची संमती द्या' असं कवितेच्या शेवटी लिहितात. या कवितांमधून एकीकडे सामान्य जनांच्या दुःखामुळे हळहळणारे सावरकर आपल्याला दिसतात तर दुसरीकडे 'तुजसाठी मरण ते जनन । तुजवीण जनन ते मरण ।' असं 'स्वतंत्रतेचे स्तोत्र' लिहून स्वराज्याची स्वप्नं आणि अभिनव भारताची महत्वाकांक्षा बाळगण्याची शिकवण देणारे सावरकरही आपल्याला दिसतात. पुढे तानाजी मालुसरे व बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा लिहून इतिहासातून प्रेरणा घेण्याचा मंत्र सावरकर देतात.
लंडनला शिकायला गेल्यावरही भरपूर काव्यलेखन सावरकरांनी केलं आहे. आपल्या चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला, भावांना अटक झाली, परिवाराची वाताहात होत आहे. असं थोरल्या वहिनीच्या पत्रातून कळल्यावर सावरकर त्यांचे सांत्वन करतांना लिहितात 'अमर होय ती वंशलता । निर्वंश जीचा देवाकरिता ।' आपण देवकार्यासाठी आणि देशकार्यासाठी निर्वंश झालो तर आपण अमर आहोत हे लक्षात ठेवा. असं सांगून सावरकर आपल्या वहिनीला धीर देतात. पण स्वतःला धीर कोण देणार ? जेव्हा आपल्या प्रियजनांच्या व मातृभूमीच्या आठवणीने व्याकुळ होवून सावरकर म्हणतात 'ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा प्राण तळमळला ।' त्यावेळी ब्रायटनच्या समुद्रकिनाऱ्यावर निरंजन पाल (बिपिन चंद्र पाल यांचा मुलगा) जर सावरकरांसोबत नसता तर कदाचित ही कविता आपल्याला ऐकायलाही मिळाली नसती. सर्व क्रांतिकारकांना देशासेवेची प्रेरणा देणारे सावरकर, जाहीरपणे क्रांतीची भाषा बोलणारे सावरकर, स्वतःचं दुःख समुद्राकडे एकांतात व्यक्त करतात. कारण दुःखाचा बाजार मांडून जगणाऱ्या लोकांपैकी सावरकर नाहीत. ही बाब आपण जाणली पाहिजे.
पुढे सावरकरांनी 'आत्मबल' ही कविता रचली. इंग्रजी जहाजातून निसटण्याचा प्रयत्न केला पण तो असफल झाला. म्हणून आता इंग्रज आपला अमानुष छळ करणार हे कळल्यावर स्वतःलाच धैर्याचा पुरवठा करतांना सावरकर लिहितात -
'अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला
मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला
अट्टहास करित जईं धर्मधारणीं
मृत्युसीच गाठ घालु मी घुसे रणीं
अग्नि जाळि मजसी ना खड्ग छेदितो
भिउनि मला भ्याड मृत्यु पळत सूटतो'
'आत्मबल' कवितेतून आत्म्याचं गर्वगीत लिहून 'आत्मा अमर आहे' अशा प्राचीन हिंदू धर्माचं तत्वज्ञान आपल्या कवितेत मांडणारे सावरकर पुढे १९१९-२० दरम्यान अतिशय अशक्त होतात आणि अनेक महीने शय्येवर पडून घालवल्यावर पुन्हा मृत्यूशी संवाद साधतात -
'ये मृत्यो ये । तूं ये ! यावयाप्रती
निघालाचि असशिल जरी ये तरी सुखें !'
'मरणोन्मुख शय्येवर' या कवितेत मृत्यूला आपल्या जीवनाचा सार सावरकर सांगतात. त्यात जीवनातील ऋणांचा हिशेब देतात, प्रभाकराच्या जाण्याचं दुःख व्यक्त करतात परंतू सोबतच 'अभिनव भारत' म्हणजेच माझा पुत्र आहे असंही मृत्यूला सांगतात. शेवटी होणाऱ्या यातनांशी झगडणे हे देखील मानवाच्या कर्तव्यपालनाचा एक भाग आहे. असं सावरकर या कवितेत सांगतात. आधी यातना सहन करण्यासाठी 'आत्मबल' कवितेतून स्वतःचे धैर्य वाढवणारे सावरकर आणि नंतर 'मरणोन्मुख शय्येवर' या कवितेतून यातना सहन करणं कर्तव्यपालनाचा भाग आहे असं स्वतःला सांगणारे सावरकर असे दोन स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्याला दिसतात. शारिरिक व मानसिक स्थितीनुसार माणसाच्या विचार आणि तत्वांमध्येही बदल होत असतो ही बाब इथे प्रकार्षाने समोर येते. मरणोन्मुख शय्येवर, सप्तर्षी, जगन्नाथाचा रथ या कवितेतून परतत्वाचा स्पर्श लाभलेल्या एका प्रज्ञावान तत्वज्ञाचं दर्शन आपल्याला घडतं. मानवी जीवन, त्याचं सृष्टीशी असणारं नातं, त्याचा परमात्म्याशी असणारा संबंध, मानवी जीवनातील कर्मरहस्य, त्याचं जगतातील स्थान, त्याचं जन्म प्रयोजन असा तत्वज्ञानाचा विशाल पट या कवितांमधून सावरकर आपल्यासमोर उभा करतात.
मृत्यूला आव्हान देणारे सावरकर तुरुंगात असतांना 'कमला' हे दीर्घकाव्य सुद्धा लिहितात. पानीपत युद्धाच्या काळातील एका कथानकाचा आधार घेऊन 'कमला' काव्य लिहिल्या गेलं. 'कमला' काव्यातून सावरकरांच्या प्रतिभाविलासाचा प्रत्यय येतो.
'प्रतिपत् चांदण्या येता व्योमी चंद्रकला जशी
चंद्रिकेच्या प्रभाताच्या मिश्रणात उषा जशी'
बालपण आणि यौवन यांच्या सीमेवर असलेल्या कमलेचं वर्णन करतांना सावरकर रात्रीचं चांदणं आणि प्रभातीचा प्रकाश यांच्या मिश्रणात शोभणाऱ्या उषेची उपमा वापरतात. अशा अनेक श्रृंगारीक वर्णनांनी नटलेलं 'कमला' पुढे वीर रसातही रंगून जातं. मात्र 'कमला' या काव्यचा शेवट अतिशय नाट्यमय पद्धतीने होवून हे काव्य शोकांतिका ठरतं. अतिशय यातना आणि प्रतिकुल परिस्थितीला तोंड देत असतांना सावरकरांनी हे काव्य रचलं. त्यामुळे 'कमला' हे दीर्घकाव्य म्हणजे सावरकरांच्या प्रतिभाशक्तीचा एक सुंदर असा आविष्कार ठरतो.
खरं तर सावरकरांच्या कविता म्हणजे जीवन जगण्याची पद्धतीच आहे. सर्व मानवी भाव-भावना आणि साहित्य रसांनी नटलेले सावरकरांचे काव्य म्हणजे इतिहास, साहित्य आणि तत्वज्ञान यांचा संगम आहे. सध्या कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगाची वाताहात होतांना आपण बघत आहोत. अशा स्थितीत आपलं मनोबल खचू न देता एक चांगलं जीवन जगण्यासाठी आणि मानवतेला जपण्यासाठी आपल्यातील सर्व भेद नष्ट करून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेलं साहित्य अभ्यासणं अतिशय आवश्यक आहे असं मला वाटतं. फक्त एक साहित्यप्रकार म्हणून नाही तर जीवन जगण्याची मार्गदर्शक पद्धती म्हणून आपण सावरकरांच्या कवितांचा अभ्यास केल्यावर आपल्या व्यक्तिमत्वाला निश्चितच सकारात्मकतेचा सुगंध प्राप्त होईल. शेवटी एवढच लिहितो की साहित्य आणि इतिहास या दोन विषयांना आपण आपल्या जीवनात व्यवसाय म्हणून किंवा छंद म्हणून तरी स्थान दिलं पाहिजे कारण हे दोन विषय मानवाला जगणं शिकवित असतात.
© गंधार विश्राम कुलकर्णी
संपर्क - ९१५८४१६९९८