Followers

Saturday, September 17, 2022

शनिवारची संध्याकाळ...

हिमाचल प्रदेशचा टूर होवून बरेच महिने झाले. माइंड फ्रेश झाल्यामुळे आम्ही पुन्हा आपापल्या कामाला लागलो. त्यानंतर एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट या सर्व महिन्यात सतत काहीना काही कार्यक्रम सुरुच होते. मित्राचं लग्न, भावाची मुंज, विविध कार्यक्रमांचे निवेदनं, सोबतच महाविद्यालयीन कामं आणि नेट-सेट परीक्षेचा न संपणारा अभ्यास. गेल्या वर्षापेक्षा या वर्षामध्ये महाविद्यालयाचे कामसुद्धा खूप वाढले होते. सकाळी एम. ए. च्या वर्गांवर दोन लेक्चर आणि दुपारी बी. ए. च्या वर्गांवर तीन लेक्चर असे दररोज पाच लेक्चर मी घ्यायला लागलो. त्यासाठी स्वतःच्या जुन्या नोट्स आणि पुस्तकांना पुन्हा चाळणं सुरु झालं. आधी रविवार म्हंटलं की 'मामाच्या घरी जाणं', 'मित्रांच्या घरी चक्कर मारणं' किंवा 'सिनेमा बघायला जाणं' यापैकी काही तरी मी करायचो. पण आता खूप जास्त व्यस्ततेमुळे मी सोमवारच्या सकाळपासूनच 'रविवार कधी येईल ?' असा प्रश्न स्वतःला विचारायचो.

मध्यंतरी काही दिवस तर व्यस्ततेची सीमा ओलांडणारे ठरले ! अनंत चतुर्दशीच्या आधीचा दिवस म्हणजे ८ सप्टेंबर २०२२ (गुरुवार) भयंकर व्यस्ततेचा व धावपळीचा होता. वरच्या परिच्छेदात उल्लेख केल्याप्रमाणे सकाळी एम. ए. चे लेक्चर चांगलेच ताकतीने घेतले. त्यानंतर घरी येऊन घाई-घाईत जेवलो आणि दुसऱ्या महाविद्यालयात बी. ए. चे लेक्चर घ्यायला गेलो. दुपारचे तीन लेक्चरसुद्धा सकाळप्रमाणेच ताकतीने झाले. घरी येतांना एका मंदीरात जायचं होतं. तेही काम झालं आणि मी व आई घरी पोहोचलो. त्याच दिवशी अचलपूरातील एका गणेश मंडळाने महिलांच्या सन्मानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. आयोजन मंडळात माझा जीवलग मित्र असल्यामुळे त्या कार्यक्रमाचं निवेदन करण्याची जबाबदारी माझ्याकडे होती. त्यामुळे घरी आल्यावर फ्रेश झालो आणि थोडा नाश्ता करून कार्यक्रम स्थळी जाण्यासाठी निघालो. दोन-अडीच तासाचा अतिशय सुंदर कार्यक्रम झाला. कार्यक्रम चांगला झाला या आनंदात बिट्टया आणि वांगे-बटाट्याच्या मसालेदार भाजीवर मी चांगलाच ताव मारला. दुसऱ्या दिवशी म्हणजे ९ सप्टेंबरला गणपती विसर्जनाची सूटी होती. पण त्या दिवशीसुद्धा मी माझ्या मावशीकडे होतो. तिच्या घरी जेवण होवून गणपती विसर्जन करून घरी यायला संध्याकाळचे पाच वाजले. गणपती विसर्जनाची सूटी पण अशीच गेली.

घरी आल्यावर थोडा अभ्यास केला आणि तो दिवससुद्धा संपला. मग उजाडला शनिवार ! पुन्हा सकाळी आणि दुपारी लेक्चर झाले. संध्याकाळी घरी आल्यावर मी थकलेलोच होतो. गेल्या तीन-चार महिन्यांपासून आमच्या घरी मांजरीचे तीन पिल्लं रहायला आहेत. आम्ही रोज त्यांना कॅट फूड आणि दूध देतो. पण खूप थकून आल्यावर त्या तीन पिल्लांना कॅट फूड आणि दूध देणं म्हणजे एखाद्या लंगरमध्ये वाढण्या एवढं मोठं काम वाटतं. अर्ध्या तासाची नित्य उपासनासुद्धा मोठ्या होम-हवनाप्रमाणे भासते. तरीही हे दोन्ही कामं झाले आणि त्यानंतर मी निवांत बसलो. दुसरा दिवस म्हणजे रविवार आणि त्या दिवशी काहीच काम नाही, फक्त आराम ! असा विचार मी करत होतो. "उद्या दिवसभर आराम करायचा आणि पुन्हा सोमवारपासून कामाला लागायचं." असं मी स्वतःशीच बोललो. खरं तर "आराम केल्यावर माइंड फ्रेश होतो आणि नंतर काम करण्याची मजा येते" असं आपण नेहमी म्हणतो. पण याच वाक्याची दुसरी बाजू म्हणजे मनसोक्त आराम करण्याची मजा खूप थकल्यावरच येते ! अशीच विचित्र गोष्ट शनिवार आणि रविवारची आहे. रविवारच्या सूटीचा आनंद आपल्याला 'शनिवारची संध्याकाळ' देत असते, कारण रविवारनंतर आपल्याला व्यस्त करणारा सोमवार पुन्हा येतच असतो. त्यामुळे रविवारच्या आधी आपण 'शनिवारची संध्याकाळ' जगायला हवी.

© गंधार कुलकर्णी
दि. १७-०९-२०२२

1 comment:

  1. असे वाटते की आठवड्यात दोन रविवार असावेत. रविवारची वास्तविक परिस्थिती आहे.

    ReplyDelete