Followers

Wednesday, September 27, 2023

भगत सिंह

बहरलेल्या पिकांतूनी
वाऱ्यासम धावत होता
क्रांती करण्यासाठी तो
मातीत शस्त्रे पेरत होता

रक्ताळ लाल माती त्याने
घरात ठेवून पूजली होती
उध्वस्त करेल गोरी सत्ता
गाठ मनाशी बांधली होती

ध्येयपूर्तीसाठी आता
गृह त्यागाची वेळ आली
भगत छाव्याला तेव्हा
पंजाब सिंहाची भेट झाली

पाहणी करण्या भारताची
सायमन कमीशन आले
सायमन परत जा स्वदेशी
ही गर्जना हिंदलोकी चाले

सॉंडर्सचा आदेश होता
लाठीचा भडीमार झाला
लालाजी पडले खाली
मोर्चा तो मागे हटला

हिंसेला उत्तर देण्यास
आता हिंसाच करणार
रक्ताळ लाल रस्त्याला
आम्ही रक्तानेच धुणार

बहिऱ्यांना ऐकविण्यासाठी
आपण मोठ्यानेच बोलू
'इंकलाब'चा नारा देऊन
सगळे आनंदात डोलू

शेवटची घडी आली
'रंग दे बसंती' गाऊया
चला फासावर लटकून
आपण अमर होऊया

© गंधार कुलकर्णी
  ९१५८४१६९९८

Monday, July 3, 2023

मानवता

वाणीची शुद्धता । होतसे मंत्राने ।
जीवा सुखविणे । श्रेष्ठ भक्ती ।।

आत्मज्ञान असे । जीवनाचे ज्ञान ।
त्यास मिळवून । संतोषावे ।।

राष्ट्रासाठी कार्य । सेवा समाजाची ।
चिंता या विश्वाची । कर्म खरे ।।

ईश्वराचा वास । प्रत्येक जीवात ।
ठेवावी मनात । भूतदया ।।

सांगतो गंधार । भेद विसरूनी ।
जपावी सर्वांनी । मानवता ।।

© गंधार कुलकर्णी
दि. २२ एप्रिल २०२०

Wednesday, May 3, 2023

ग्रंथालय : माझं दुसरं घर

शाळा किंवा महाविद्यालय म्हंटलं की प्रत्येकाच्या जीवनातील अनेक गोड आठवणींना उजाळा मिळतो आणि एखाद्या चलचित्राप्रमाणे सर्व आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहतात. माझ्याही बाबतीत असच काहीसं घडलं, जेव्हा मला जगदंब महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख डॉ. वानखडे मॅडम यांनी महाविद्यालयीन जीवनातील अनुभवांवर लेख लिहायला सांगितला. तेव्हापासून गवतावर असंख्य दवबिंदू जमावे त्याप्रमाणे मनाच्या विविध कोपऱ्यात असलेल्या अनेक आठवणी एकत्र जमू लागल्या. सततचे कामं आणि न लाभणारी शांतता यामुळे आठवणींना कागदावर उतरवणं कठीण होऊ लागलं. शेवटी "शनिवार-रविवारमध्ये लेख लिहून पूर्ण करायचा" असं ठरवलं आणि लिहायला सुरवात केली.

२०१८ मधील जून महिन्याच्या शेवटी-शेवटी जगदंब महाविद्यालयामध्ये माझा प्रवेश झाला आणि दोन-तीन दिवसानंतरच मी महाविद्यालयात जाण्यास सुरवात केली. एम. ए. इतिहासाची प्रवेशप्रक्रिया सुरू असल्यामुळे इतर विद्यार्थी महाविद्यालयात अद्याप येत नव्हते. त्यामुळे सुरवातीचे बरेच दिवस मी एकटाच इतिहासाच्या वर्गात बसायचो. आमचे विभागप्रमुख प्रा. टाले सर अनेकवेळा विनोदाने म्हणायचे,"यावर्षी गंधार आपला एकटाच विद्यार्थी आहे" प्रा. माहोरे सर व प्रा. भटकर सरांनी मला अभ्यासक्रम आणि पुस्तकं सांगितले. 'एक विद्यार्थी असला तरी वर्ग घेणं' ही गोष्ट इतिहास विभागाने मला शिकवली. वर्ग झाल्यावर इतर विद्यार्थी नसल्यामुळे मी ग्रंथालयात पुस्तकं घेण्यासाठी गेलो. तेव्हा कला शाखेच्या विद्यार्थ्यांना पुस्तकं देणाऱ्या ग्रंथालयातल्या नाना काकांनी बी.टी. कार्ड काढण्यासाठी पावती मागितली आणि "दोन-तीन दिवसांनी ये" असं सांगितलं. मी टाले सरांना सांगून घरी आलो. पुस्तकं न मिळाल्यामुळे नोट्स लिहायला सुरवात होऊ शकली नाही. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा सकाळी ग्रंथालयामध्ये पोहोचलो. नाना काका आणि स्वप्निल दादा समोरच बसले होते. "बी.टी. कार्ड तयार झालं का काका ?" मी विचारलं आणि बी.टी. कार्ड मिळेपर्यंत तिथेच उभा राहिलो. शेवटी काकांनी मला बी.टी. कार्ड दिलं. त्यानंतर पुस्तकं घेतले आणि वाचन सुरू केलं. जेव्हा मी पहिल्यांदा ग्रंथालयात गेलो, तेव्हा समोर हजारो पुस्तकं पाहून खेळण्याच्या दुकानात गेल्यावर लहान मुलाची जशी अवस्था होते, तशी अवस्था माझी झाली होती. त्यामुळे 'रोज वर्ग झाल्यावर आपण ग्रंथालयामध्ये एक चक्कर मारायचाच' असं मी मनाशी ठरवलं.

त्यानंतर रोज वर्ग झाल्यावर मी ग्रंथालयात जायला लागलो. नाना काका, स्वप्निल दादा, डॉ. बेलसरे सर, मारुती काका यांच्यासोबत रोज बोलणं सुरू केलं. त्यामुळे ग्रंथालयातील पूर्ण स्टाफसोबत माझी चांगली ओळख झाली. जेव्हा आमची पुस्तक बदलवण्याची तारीख असायची तेव्हा मी नाना काकांना, "तुमची मदत करू का ?" असं विचारायचो आणि काकांनी होकार दिला की पटापट विद्यार्थ्यांना पुस्तकं बदलवून द्यायचो. नाना काकांची पुस्तक वाटण्यात मदत केल्याचे मला अनेक फायदे झालेत, ते म्हणजे ग्रंथालयातील खूप पुस्तकांची व त्यातील मजकूराची मला माहिती झाली, पुस्तकांची नोंदणी व विषयानुसार विभागणी कशी करतात ते कळलं, महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांसोबत ओळख झाली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मला माझ्या बी.टी. कार्ड वर दोनपेक्षा जास्त पुस्तकं मिळू लागले. बेलसरे सर आणि नाना काकांनी माझ्यातला 'पुस्तकप्रेमी' हेरला आणि "पाहिजे तेवढे पुस्तकं वाच !" असं विश्वासाने मला सांगितलं. त्यानंतर ग्रंथालयाच्या समितीसाठी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून माझी निवड झाली. रंगनाथन जयंतीच्या कार्यक्रमामध्ये मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली. ग्रंथालयासाठी पुस्तकं मागवण्याच्या वेळी बेलसरे सर मला आवर्जून सांगायचे आणि माझ्याकडून पुस्तकांची यादी मागवायचे. एका विद्यार्थ्याचे मत विचारात घेऊन ग्रंथालयात पुस्तकं आणणे. ही एका विद्यार्थ्यासाठी फार मोठी गोष्ट असते आणि अशा गोष्टींमुळे विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढत असतो.

'हा विद्यार्थी नेहमी ग्रंथालयात बसलेला असतो.' असं लक्षात आल्यावर तत्कालीन मराठी विभागप्रमुख डॉ. गडकर मॅडम यांनी मला काही ठराविक पुस्तकं वाचायला दिले. स्वामी विवेकानंदांवरील अनेक पुस्तकांचं वाचन झाल्यामुळे इंग्रजी विभागातील प्रा. पाटील सरांनी वक्ता म्हणून मला पहिली व्याख्यानाची संधी दिली. एवढच नव्हे तर संस्थेचे अध्यक्ष श्री. रमाकांतजी शेरकार सर, प्राचार्य डॉ. रोहणकर सर तसेच महाविद्यालयातील प्रा. मुळे सर यांच्यासोबत सुद्धा एक-दोन वेळा पुस्तकांविषयी चर्चा झाली. ग्रंथालयाशिवाय माझा महाविद्यालयातील इतर सर्वच विभागांशी जवळून संबंध आला. पण त्याची सुरवात ग्रंथालयापासून आणि ग्रंथालयामुळे झाली, म्हणून लेख लिहितांना ग्रंथालयाविषयी अनुभव लिहावे असं मी ठरवलं होतं. माझं विद्यार्थी जीवन संपलं आणि तासिका तत्वावरील प्राध्यापक म्हणून मी पुन्हा जगदंब महाविद्यालयात काम करायला सुरवात केली. महाविद्यालयातील माझी भूमिका थोडी बदलली. पण विद्यार्थी असतांना सर्व प्राध्यापक व क्लरीकल स्टाफसोबत जे मैत्रीचं नात जुळलं ते अजूनही तसच कायम आहे.

हे सर्व लिहिण्याचं तात्पर्य म्हणजे की 'प्रेमानी बोलून सुद्धा महाविद्यालयातील आपले सर्व कामं होऊ शकतात' ही गोष्ट आजच्या विद्यार्थ्यांना जाणून घेण्याची आणि आचरणात आणण्याची फार आवश्यकता आहे. कारण विद्यार्थ्यांच्या वागण्या-बोलण्यामुळे त्यांचे होत असलेले कामं बिघडतांना मी पाहिले. खरं सांगायचं झालं तर शाळा-महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व मदत करण्यासाठीच असतात आणि हेच लोकं विद्यार्थ्यांचे चांगले मित्रही बनू शकतात. फक्त आपल्यामध्ये मैत्री करण्याची कला व हिम्मत असायला हवी. कोणत्याही मुलाला त्याचे पहिले मित्र घरातून भेटतात आणि ते त्याचे आई-वडील असतात. या तत्वानुसार विचार केल्यास महाविद्यालयामधील मला माझे पहिले मित्र ग्रंथालयात भेटले. म्हणून जगदंब महाविद्यालयातील ग्रंथालयाला मी माझं दुसरं घर समजतो.

गंधार विश्राम कुलकर्णी
   (९१५८४१६९९८)
     इतिहास विभाग
जगदंब महाविद्यालय,
         अचलपूर

Sunday, January 29, 2023

चाहता हूँ


अब तक जो सोचता था
वो बयां करना चाहता हूँ
इशारों में बोल नहीं पाया
लफ्जों से कहना चाहता हूँ

जिसकी मंजिल तुम हो
वो पथ चलना चाहता हूँ
जो सिर्फ तुम तक पहुंचे
वो खत लिखना चाहता हूँ

हर रात जो तुम देखो
वो सपना होना चाहता हूँ
हर पल तुम्हारे साथ हो
ऐसा अपना होना चाहता हूँ

तुम्हारे हाथों में रहनेवाली
प्रेम की लकीर होना चाहता हूँ
जिसकी हर दुआ में तुम रहो
ऐसा फकीर होना चाहता हूँ

जिसमें तुम्हारी यादें हो
वो डायरी लिखना चाहता हूँ
जिसकी तुम प्रेरणा हो
वो शायरी लिखना चाहता हूँ

तुम्हारी जिंदगी का हसीन
किस्सा बनना चाहता हूँ
तुम्हारी जिंदगी का अभेद
हिस्सा बनना चाहता हूँ

जो तुम्हारे बाद आए
वो नाम बनना चाहता हूँ
अगर तुम सीता बनी
तो मैं राम बनना चाहता हूँ

© गंधार कुलकर्णी
२५ जानेवारी २०२३

Thursday, January 5, 2023

रस्त्यावर मिळालेली शिकवण...

 
सध्या सर्व शाळा-महाविद्यालयांमध्ये परीक्षेची धावपळ सुरू आहे. त्यात आमच्या महाविद्यालयातील परीक्षेची जबाबदारी आईकडे असल्यामुळे ही धावपळ आम्हाला जरा जास्तच जाणवते. रोज सकाळी आणि दुपारी दोन्ही शिफ्टमध्ये पेपर असल्यामुळे आई आणि मी सकाळी ८ वाजता घरून निघालो की सर्व कामं संपवून घरी यायला संध्याकाळचे ६ वाजतात. सकाळचा पेपर झाल्यावर बाबांनी आणलेला डबा आम्ही जेवतो आणि पुन्हा कामाला लागतो. परीक्षा केंद्र व्यवस्थित राहावं यासाठी अनेकवेळा आम्हाला स्वतःच्या मूळ स्वभावापेक्षा विरुद्ध वागावं लागतं. आपण कितीही मनमिळावू आणि बिनधास्त स्वभावाचे असलो तरीही आवश्यकतेपेक्षा जास्त कडकपणे वागावं लागतं. खरं तर विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात एका बारीक धाग्याप्रमाणे जो फरक असतो तो कायम ठेवण्यासाठी असं वागावं लागतं. कॉलेजचे आणि परीक्षेचे कामं, विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या समस्या, ऐन कामाच्या वेळेत भेटायला येणारे अनेक लोकं, इतर महाविद्यालयातले मार्गदर्शन घ्यायला येणारे काही विद्यार्थी अशा सर्व गोष्टी पूर्ण करून आम्ही घरी येतो. गेल्या एक-दीड महिन्यांपासून वरीलप्रमाणे आमची दिनचर्या सुरू आहे. कधी कधी कामाच्या तणावामुळे थोडी चिड-चिड सुद्धा होते. दुनियादारीच्या नावाखाली मनाला पटत नसलेल्या गोष्टी कराव्या लागल्या की रात्री झोपण्यापूर्वी एक प्रश्न निर्माण होतो. "आपल्या स्वभावातील कृत्रिमता वाढत तर नाही चालली ?"

असं यंत्राप्रमाणे काम करत राहण्याचा आणि अतिशय व्यस्ततेच्या इतर दिवसांसारखा आजचाही दिवस असेल असं कॉलेजमधून निघतांना मला वाटलं. आई आणि मी कॉलेजमधून निघालो आणि परतवाड्यातील वाघामाता मंदिरासमोरून आमची गाडी जात असतांना मनाला आनंद व समाधान देणारा एक छोटासा प्रसंग घडला. वाघामाता मंदिराजवळ एक झोपडपट्टी आहे. बरेचदा संध्याकाळच्या वेळी झोपडपट्टीतील लहान मुलं खेळता-खेळता रस्त्यावर येतात. त्यामुळे तिथून जात असतांना गाडी थोडी हळूच चालवावी लागते. आजसुद्धा झोपडपट्टी समोरून जात असतांना मी गाडीची स्पीड कमी केली. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने कुत्र्याचं एक छोटं पिल्लू हळूहळू चालत रस्ता पार करत होतं आणि त्याच बाजूने एक ट्रक भयंकर वेगात येत होता. तेवढ्यात झोपडपट्टीतील एका लहान घरातून एक लहान मुलगी रस्त्यावर धावत आली आणि कुत्र्याच्या पिल्लाला उचलून डिवाइडरपर्यंत घेऊन गेली. तिने डिवाइडरवर पिल्लाला सोडलं आणि पुन्हा धावत आपल्या घरात गेली. आम्ही गाडीतून हे सर्व बघत होतो. काही क्षणात घडलेला हा प्रसंग होता.

आम्ही घरी पोहोचलो. मी आणि आईने हा प्रसंग बाबांना सांगितला. आमच्या घरीसुद्धा एका मांजरीने काही महिन्याआधी तीन पिल्लं दिले. तेव्हापासून आम्ही त्यांना कॅटफूड आणि दूध देत आहोत. गाडीचा आवाज आला की तीनही पिल्लं धावत येतात, पायाशी खेळतात, बाबांसोबत पाळण्यावर बसतात. दिवसभरातील कामाचा थकवा या तीन पिल्लांना बघून निघून जातो, मन प्रसन्न होतं, चेहऱ्यावर आनंद येतो. असं का होतं ? याचा विचार आपण केला आहे का ? रोज आपण कित्येक लोकांसोबत वावरतो. त्यात गरीब, श्रीमंत, विद्वान, चतुर, चापलूस, मुफट अशा अनेक प्रकारचे लोकं असतात. तरीही त्यांच्यासोबत आपण ठराविक काळापेक्षा जास्त राहू शकत नाही. परंतु पक्षी किंवा प्राण्यांचा सहवास आपल्याला इरिटेड होत नाही. एखाद्या वेळेस आपण रस्त्यावर पडलेल्या माणसाकडे दुर्लक्ष करू पण एखाद्या प्राण्याला गाडीमुळे काही दुखापत झाली तर आपल्याला काही क्षण तरी वाईट वाटतं.

आज अनेक लोकं माणसांपेक्षा जास्त प्राण्यांवर प्रेम करतात. या सर्व भावनिक भानगडीचं मुख्य कारण म्हणजे माणसांमध्ये घटत असलेली निरागसता व सरलता आणि वाढत असलेली कृत्रिमता आहे, असं मला वाटतं. माणसाचे पिल्लं मोठं झालं की त्याच्यातील निरागसता कमी होते आणि कृत्रिमता वाढते. परंतु प्राण्यांच्या पिल्लांबाबत असं होत नाही. खरं तर माणूस जितका उच्चशिक्षित, सुसंस्कृत, श्रीमंत व विद्वान होतो आहे, तितकी त्याच्यातील कृत्रिमता वाढत आहे. प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांच्या 'वाइज अँड अदरवाइज' या पुस्तकातील एका लेखामध्ये त्यांनी रस्त्यावरील एका भिकाऱ्याचं उदाहरण देऊन तो इतर श्रीमंत लोकांपेक्षा कसा जास्त सुखी आहे, हे सांगितलं आहे. प्राणी, पक्षी किंवा लहान मुलांकडे बघून आपल्याला आनंद होत नसतो तर आपल्याला आनंद देत असते त्यांच्यातील निरागसता व सरलता. 'झोपडपट्टीतील मुलगी आणि रस्त्यावरील कुत्र्याचं पिल्लू' हा प्रसंग जरी काही क्षणात घडलेला असला तरी त्यातून एक फार महत्वपूर्ण शिकवण मला मिळाली. सुखी व आनंदी जीवन जगण्यासाठी निरागसता व सरलता खूप आवश्यक आहे. जी त्या झोपडपट्टीतील मुलीमध्ये आणि रस्त्यावरील कुत्र्याच्या पिल्लामध्ये होती.

© गंधार कुलकर्णी
५ जानेवारी २०२३