लक्ष्मी पूजन आणि तुळशीचे लग्न झाले की लग्नाच्या तिथी सुरु होतात. कधी कधी तर एकाच महिन्यात दहा-बारा लग्नात किंवा लग्नानंतरच्या स्वागत समारंभात जावं लागतं. मग अशा ठिकाणी अनेक लोकं भेटतात आणि अनेक लोकांच्या विविध विचित्र सवयीसुद्धा बघायला मिळतात. कधी कधी आपल्याही डोक्यात कोणतेच विचार नसलेत की आपण समोरच्या लोकांचं निरीक्षण करायला लागतो आणि त्यात काही विचित्र वाटलं तर त्याचा विचारही करायला लागतो. कामाच्या व्यस्ततेत तर असं निरीक्षण वगैरे काही होत नाही. पण शनिवारच्या संध्याकाळी एखाद्या ठिकाणी जाण्याचा योग आला आणि तिथे जर असं काही आढळलं तर मग विचारचक्र सुरु होऊन अशा लेखांचा जन्म होतो.
काल संध्याकाळी आम्ही एका लग्नात गेलो होतो. आता लग्न म्हंटलं की अनेक प्रकारचे पदार्थ आणि त्यात काही पदार्थांमध्ये विविधताही बघायला मिळते. प्रत्येक लग्नात काही ठराविक पदार्थांसमोर तो पदार्थ मिळविण्यासाठी लोकांची धडपड सुरु असते. उदा. पाणीपुरी, नूडल्स, आइसक्रीम आणि गरम पोळी. कालच्या लग्नातसुद्धा गरम पोळी मिळविण्यासाठी होणारा एक छोटासा संघर्ष मी बघितला. कालच्या लग्नात पोळ्यांचे दोन टेबल लावलेले होते. त्यात एका ठिकाणी गरम पोळ्या करून ठेवलेल्या होत्या तर बाजूलाच दुसऱ्या टेबलवर तव्यावरची टम्म फुगलेली पोळी थेट ताटात मिळत होती. तिथेच गरम पोळी मिळविण्यासाठी लोकांची गर्दी जमलेली होती. मी तिथे गेलो तर माझ्यासमोर सूट-बूट घातलेले आणि जरा सभ्य वाटणारे दोन माणसं उभे होते. पोळ्यावाल्या बाईने एक पोळी गरम केली आणि त्या दोघांपैकी एकाच्या ताटात पोळी टाकणार इतक्यात दुसऱ्या माणसाने "मी पण इथे उभा आहे, आधी मला पोळी द्या" असं म्हणून थोडा वाद घातला. तिथला वाद बघून मी बाजूच्या टेबलवरील भांड्यातील थोडी कोमट झालेली पोळी घेऊन माझं जेवण पूर्ण केलं आणि आम्ही घरी आलो.
आता असे कित्येक प्रसंग प्रत्येक लग्नात घडतात आणि आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपलं काम करतो, जसं मीसुद्धा केलं. पण कधी अशा घटनांचा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की आपण किती आत्मकेंद्रित व स्वार्थी होत आहोत. खाण्याची हौस असणारे आणि आवडीने प्रत्येक पदार्थाचा आस्वाद आणि आनंद घेणारे खूप लोकं मी बघितले आहे. पण असे वाद बघितल्यावर, गरम पोळी मिळाली नाही किंवा पोळी दुसऱ्याला आधी मिळाली म्हणून एखाद्या समारंभात वाद करण्याइतके आपण संकुचित विचारांचे आणि वृत्तीचे होत आहोत का ? असा प्रश्न मनात निर्माण होतो. आपल्या घरी गरम पोळीवर तूप घेऊन खाणे ही गोष्ट वेगळी आहे, पण तशीच गरम पोळी आपल्याला सगळीकडे मिळालीच पाहिजे, असा हट्ट करणे, हे किती मूर्खपणाचं लक्षण आहे.
विषय गरम पोळीवरून सुरु झाला, पण आपण कधी या गोष्टीचा विचार करतो का की अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड करणे, वाद करणे याचा किती वाईट परिणाम आपल्या मनावर आणि तब्बेतीवर होऊ शकतो. सुख आणि समाधान अनुभवण्यासाठीच आयुष्यभर आपण धडपड करत असतो. पण अशा क्षुल्लक गोष्टींना अति-महत्त्व देऊन आपण चिडचिड करत असू तर सुख आणि समाधान मिळणे तर दूरच उलट आपल्यामध्ये नकारात्मकता वाढत जाते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत आपण काही तरी वाईट शोधत रहातो आणि त्या गोष्टीचा आनंद घेण्यापासून मुकतो. अशी वृत्ती वाढत गेली तर काही क्षणांसाठी का होईना पण इतर लोकं आपल्याकडून दुखावले जातात. इतर लोकांचं सोडा पण अशा विचित्र वृत्तीमुळे आपल्या स्वतःच्या जीवनातील शांतता नक्कीच भंग होते. त्यामुळे एक सुखी, समाधानी, शांत व चांगलं जीवन जगण्यासाठी तरी आपण अशा विचित्र सवयी नव्हे चोचले कमी करावे आणि चांगलं जीवन जगण्याची सवय स्वतःला लावावी.
आणि तरीही गरम पोळी खाण्याची इच्छा झाल्यास, इतरांच्या समारंभात राडा न करता, प्रत्येकाने स्वतःला जशी लागेल तशी गरम पोळी आपल्या घरी खावी !
© गंधार कुळकर्णी
९१५८४१६९९८
अप्रतिम...
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteछान ...
ReplyDeleteखूप सखोल निरीक्षण👌👌आजकाल अशाच प्रबोधनात्मक लेखनाची आवश्यकता आहे.
ReplyDeleteKhup Chan Dada
ReplyDeleteखरंय. “मला आधि” वृत्ती वाढत चालली आहे
ReplyDeleteShoebkhan
ReplyDelete