Followers

Sunday, June 1, 2025

व्रतस्थ

खालील कथा रविवार, दि. १ जून २०२५ रोजी प्रकाशित झालेल्या साप्ताहिक जनमंगलच्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

व्रतस्थ

"मुंबईतील कामठीपूरा जिथे सकाळ-संध्याकाळ वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया आणि नृत्यांगनांच्या मेहफीलीसाठी लोकांची रेलचेल असते. आता तिथे परत जाण्याचा योग आला. तो म्हणजे असा की आमच्या वृत्तपत्राच्या संपादक साहेबांनी मागील एक दीड वर्षात प्रसिध्दीस आलेली याच कामठीपूऱ्यातील एक नृत्यांगना, 'इरा' हिचा 'इंटरव्यू' घेण्यासाठी माझी निवड केली. खरे तर ही जबाबदारी माझ्यावर थोपवण्यातच आली होती. काही वर्षाआधी तिथे गेलो होतो व नंतर न जाण्याचा निश्चय सुध्दा केला होता. पण कामामुळे आता परत कामठीपूरा गाठावा लागत आहे."


"कामठीपुऱ्याकडे जाण्याआधी मी रिपोर्टरच्या कपडयातून एका सामान्य माणसाच्या कपडयात आलो. दाढी, केसं थोडे जास्तच वाढले असल्यामुळे जास्त काही करण्याची गरज भासली नाही. टॅक्सी केली आणि कामठीपूऱ्याचा रस्ता धरला. थोडयाचं वेळात तिथे पोहचलो आणि इराच्या मेहफीलीकडे निघालो. कोणी स्त्रिया दरवाज्यात उभ्या राहून पाहात होत्या. तर कोणी हात दाखवत होत्या. काही स्त्रिया कमरेवर हात ठेऊन पुरुषांसोबत सौदा करत होत्या. दोन्ही बाजूंनी छोट्या-मोठ्या खोल्या, मधातच लहानश्या गल्ली बोळ्या होत्या. भोग लालसेच्या तर कोणी नृत्यांगनांवर नोटा उधळण्याच्या उद्देशाने आलेल्या लोकांमधून मी इराच्या मेहफीलीकडे चालत होतो. इतर मुलींच्या किंवा स्त्रीयांच्या खोल्या होत्या पण इराचा मेहफीलीचा दरबारचं होता. दरवाज्यातच आतील अत्तर, उद्दत्त्यांचा सुगंध येत होता. मी दरवाजा ढकलला आणि आत शिरलो. आतमध्ये मोठा हॉल होता गोलाकार गाद्या, तक्तपोस टाकले होते. मध्यभागी मखमलीचा मऊ गालीचा टाकला होता. तिथेच ही इरा आपल्या कलेचे प्रदर्शन करुन रसिकांना मोहून टाकत होती. पण आज या नृत्य दरबाराचा रंग थोडा ओसरल्यागत झाला होता. मी आत पाय टाकणार तेवढ्यात माझा सहकारी नितीन मागून आला" "तू जेव्हा त्या इराचा इंटरव्यू घेशील तेव्हा तिचे फोटो आणि व्हिडीयो काढण्यासाठी मला संपादक साहेबांनी तुझ्या मागे पाठवले" असे त्यानी सांगितले. "आमच्या चाळीशीच्या जवळपास असणाऱ्या हुशार संपादक साहेबांना एका वेश्या वस्तीतील इरामध्ये इतका इंटरेस्ट का असावा ? हे आमच्या डोक्यावरुन चालले होते. म्हणून संपादक साहेबांनी जे सांगितले ते जास्त डोकं न चालवता करणे आणि या वस्तीतून लवकरात लवकर बाहेर पडणे, असे आम्ही मनाशी ठरवून आतमध्ये शिरलो"

"आतमध्ये अंधार होता तक्तपोस आणि गादयांवरील चादरीवर अजून वळी पडल्या नव्हत्या. तबकही पूर्णपणे भरुन तयार होते. त्यातील विडयाच्या पानाला रसिक श्रोत्यांच्या हातांचा स्पर्श होणे अजुन शिल्लक होते. तबला, पेटी, सतार सर्व वाद्य जणू वादकांची प्रतिक्षा करत होते. ऐन मेहफील रंगण्याच्या वेळी या नृत्य दरबाराचे असे चित्र पाहून मी आणि नितीन थोडे विचारातच पडलो. "का रे संजय आपण चुकीच्या वेळी तर इथे आलो नाही ना?" असा प्रश्न मला नितीनने विचारला. मी काही बोलणार तेवढ्यात आतमधून एक तरुणी बाहेर आली. आम्हाला बघून एकदम थांबली. "कोण तुम्ही ? आज इथे नाच गाणे बंद असतात साहेब ! उदया याल, आज काहीच भेटणार नाही इथे" असे ती आम्हाला म्हणाली. "नाही हो, आम्ही 'मुंबई जनमत' या वृत्तपत्रासाठी इराचा इंटरव्यू घेण्यासाठी इथे आलो आहे. मी नितीन आणि हा संजय तुम्हीच इरा आहात का?" नितीनने तिला असे विचारताच ती हसतचं म्हणाली "नाही हो साहेब मी रुपा आहे इराची मैत्रिण. इरा आतमध्ये आहे. या माझ्या सोबत" रुपा आम्हाला इराच्या खोलीत घेऊन गेली. तिथेही पण बाहेरच्या हॉल सारखेच वातावरण होते. त्या खोलीमध्ये सुगंधी मेणबत्यांचा मंद प्रकाश होता. लाल दिव्याचा लाल प्रकाश सर्व खोलीभर पसरला होता. खाली पैजण पडल्या होत्या. समोरच एका मोठ्या बिछान्यावर एखाद्या महाराणीने आराम करावा तशी इरा आपले अंग सैल टाकून तक्के आणि उश्यांना रेटून बसली होती. बाजूला मोगऱ्याचा गजरा पडला होता. इराचे लांब आणि मोकळे केस खाली झुलत होते. सडपातळ आणि लचकदार अंगाची, गोऱ्या वर्णाची, घारे डोळे असलेली इरा आपला नाजूक तळहात बिछान्यावर अंथरलेल्या मखमलीच्या चादरीवरुन फिरवत होती. तिचे डोळे पाणावलेले होते. माझी नजर तिच्यावर स्तब्ध झाली होती. तेवढ्यात रुपा इराला म्हणाली. "इरा दीदी हे दोन लोकं आले आहे तुझ्याकडे, तुझा इंटरव्यू घ्यायचा म्हणतात आहेत" "त्यांना समोर बसव, पाणी सरबत दे, मी येतेच" असे रुपाला सांगून इरा तिथून उठून दुसऱ्या खोलीत गेली"

"आम्ही समोर येऊन बसलो पाणी सरबत सुध्दा झाले. नितीन कॅमेरा सेट करु लागला. मी सुध्दा माझी प्रश्नांची यादी काढली. तेवढ्यात लाल रंगाची साडी परिधान केलेली इरा आमच्या समोरच्या तक्तपोसावर येऊन बसली. आम्ही तिला आमचा परिचय आणि इथे येण्याचे प्रयोजन सांगितले. "ठीक आहे. विचारा जे काही विचारायचे आहे तुम्हाला" असे ती म्हणाली. मी माझे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. नितीन कॅमेरा सांभाळत होता. इरा प्रत्येक प्रश्नावर तिचे अनुभव सांगत होती. इराच्या प्रत्येक उत्तरासोबत, तिच्या शब्दांमध्ये, चेहऱ्यावरच्या भावांमध्ये एका वेगळ्याच दुःखाची चाहूल भासत होती. तब्बल दीड तासाच्या प्रश्नोत्तरांनंतर "इरा तुम्ही आजच्या दिवशी मेहफील बंद का ठेवली आहे?" हा शेवटचा प्रश्न मी विचारला. माझा प्रश्न ऐकताच तिच्या डोळ्यातील दुःख तीव्र झाले आणि डोळ्यातच रोखून ठेवलेले आसवे अलगद तिच्या गालावर उतरले. "आपण काही चुकीचे तर विचारले नाही" असे क्षणभर मला वाटले. पण इराने या प्रश्नाचे उत्तर देण्यास सहमती दर्शवली आणि सांगायला सुरुवात केली. "चार वर्षा आधी याच जागी मी नृत्य करत होती. मेहफील रंगली होती. वादयांचा ध्वनी, पैंजणांची छनछन, मोगऱ्याचा सुगंध आणि या झुंबराच्या सोनेरी प्रकाशात मी नृत्य करत होती. रसिकजन विडयाचा आस्वाद घेत होते. ठरलेल्या वेळेवर मी नाच थांबवला, वादय थांबले आणि मेहफील संपली. आलेले सर्व लोक जायला लागले. मी सुध्दा पैंजण काढले व त्यांना नमस्कार केला. वादयांना नमस्कार केला आणि आत जायला लागली. तेवढ्यात "मी आत येऊ शकतो का ?" असा आवाज ऐकू आला. मी मागे वळून पाहिले तर दरवाज्यात पांढऱ्याशुभ्र कपडयांमध्ये एक अनोळखी व्यक्ती उभा होता. मी त्याला आतमध्ये बोलवले. तो एक टक माझ्याकडे पाहात होता. अतिशय देखणा, उंचपुरा तो तरुण माझ्या समोर येऊन उभा राहिला. "मला तुमच्यासोबत थोडे बोलायचे होते म्हणून सर्व लोक गेल्यावर आलो आहे" असे तो म्हणाला. "अहो साहेब, पहिले बसा आणि मग बोला जे बोलायचे आहे" असे मी सुध्दा त्याला म्हणाली तो खाली बसला मी त्याला पाणी दिले. पाणी पिल्यावर, "मी बरेच दिवसापासून तुम्हाला पाहात होतो. शेवटी आज हिम्मत केली आणि आतमध्ये आलो. मला तुम्ही मनापासून आवडता" असे त्याने म्हणताच मी हसायला लागली. "मला अनेक लोक दररोज हे वाक्य ऐकवतात तुम्ही पण त्यातलेच एक आहात वाटते" मी असे म्हणत असतांना तो माझ्याकडे पाहात होता. शांत बसला होता. "थोडा दाम वाढवा साहेब, घ्या हा विडा. उदया थोडे लवकर याल मेहफीलीला". "मी हसूनच असे बोलली आणि त्याला विडा दिला. त्याचा चेहरा उतरला होता. आता त्याच्या चेहऱ्यावर थोडी निराशा अवतरली होती. तो उभा राहिला आणि एक शब्दही न बोलता, विडा न घेता जसा आला होता तसाच परत निघून गेला"

"आकाशातून एखादा तारा तुटावा त्याचप्रमाणे तो अनोळखी व्यक्ती क्षणात या मेहफीलीतून बाहेर पडला. त्याने जातांना एक नजरही मागे वळवली नाही. तो या दरबारात आल्यापासून मी त्याचे निरीक्षण करत होती. तेच आता तो परत जातांना मला समजत होते. इथे येणाऱ्या सर्व लोकांच्या बुभूक्षीत नजरा माझ्या शरीरावर, पायापासून तर गळ्यार्पत असतात. परंतु तो अनोळखी व्यक्ती आल्यापासून तर परत जाईपर्यंत फक्त माझ्या डोळ्यांमध्ये पाहात होता. मी इथे दररोज लोकांसमोर नशेत असल्यासारखी नाचते. लोक माझ्यावर पैसे उधळतात. माझ्या अंगाला हात लावतात. वासनेनी भरलेल्या त्यांच्या नजरा नित्य माझ्या शरीराला टोचत असतात. ज्या ठिकाणी रोज शरीराचा व्यापार होतो. अब्रुची निलामी होते. अशा या दुशीत ठिकाणी प्रेमाचे शुध्द वारे घेऊन तो आला होता. या अपवित्र देहावर पवित्र प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी तो आला होता. जो पर्यंत त्याच्या या महान प्रेमाचा अर्थ मी जाणला तो पर्यंत तो अनोळखी माझ्या समोरुन निघून गेला होता. मी त्याला त्याचे नाव सुध्दा विचारले नव्हते. वेश्या वस्तीतील वातावरण आणि हा धंदा यामुळे आम्हाला कधी निर्मळ आणि पवित्र प्रेम दिसलेच नाही. परंतु जेव्हा ते माझ्या समोर आले तेव्हा मी त्या प्रेमाला ओळखण्यास व समजण्यास अपात्र ठरली. हाच तो दिवस आहे. याच दिवशी मी त्या अनोळखी व्यक्तीच्या वेडया प्रेमात काही वेळेसाठी का होईना पण सहभागी झाली होती. म्हणूनच आजच्या दिवशी इराचा दरबार इतरांसाठी बंद असतो. आजच्या दिवशी माझ्या अंगाला कोणाचाही हात लागत नाही. हा एक दिवस मी आणि माझी मेहफील व्रतस्थ राहून त्या अनोळखी व्यक्तीची वाट बघतो"

"एवढे बोलून जेव्हा इरा थांबली तेव्हा मी आणि नितीन सुध्दा सुन्न झालो होतो. आता आम्हाला पण ती मेहफील शांत वाटत होती. एखादया ध्यानस्थ साधूच्या चेहऱ्यावर जी शांतता असते. त्याच शांततेचा संचार त्या मेहफीलीत झाला होता. त्यानंतर जास्त काही न बोलता आम्ही परत 'मुंबई जनमत' च्या ऑफीसचा रस्ता धरला. ऑफीसमध्ये पोहोचल्यावर इंटरव्यूची सी.डी. आणि फोटो संपादक साहेबांकडे दिले आणि घरी जाण्यास निघालो"

"इंटरव्यू होऊन तीन दिवस झाले होते. मी संध्याकाळच्या मेहफीलीची तयारी करत होती. तेवढ्यात रुपा धावतच माझ्या खोलीत आली. "इरा दीदी त्या इंटरव्यू घेणाऱ्या दोघांपैकी एकजण आला होता. पेपर आणि लिफाफा माझ्या हातात देऊन परत गेला" मी पेपर उघडला तर 'मुंबई जनमत' च्या दुसऱ्याच पानावर माझा फोटो आणि पूर्ण मुलाखत छापून आली होती. रुपानी माझ्या हातातला पेपर घेतला आणि सर्वांना दाखवायला गेली. तेव्हा माझे लक्ष त्या पांढऱ्या पाकीटावर गेले जे पेपर सोबत आले होते. मी ते पाकीट उघडले आणि त्यातले पत्र काढले. त्या पत्रात फक्त चारच ओळी लिहील्या होत्या.

"हसून तू तेव्हा टाळले मला
मीही मागे फिरलो नाही
तुझ्याचसाठी व्रतस्थ राहिलो
दुसऱ्यांसाठी उरलो नाही

                     जयदेव पुरंदरे
                        संपादक,
                      मुंबई जनमत"

◆◆◆◆◆

© गंधार जयश्री विश्राम कुळकर्णी
संपर्क क्र. ९१५८४१६९९८

Friday, May 2, 2025

वक्तादशसहस्त्रेषु

निघाला होता एक प्रवासी
ध्येय त्याचे साहित्य नगरी
पुस्तकांची शिदोरी सोबती
शंभर पानांची भूक जबरी

भाषेवर प्रभुत्व मिळवून
शब्दांनाही गुलाम केले
छंदाचीच सवय करून
दहा पानं रोज लिहिले

उत्स्फूर्तपणे जे-जे सुचले
तेच त्यांचे काव्य झाले
कवितेच्या संसारात त्यांच्या
असोशी,रेघा,अंगारा जन्मले

जरी यशाचे स्वामी झाले
सोडीले नाही जन्मक्षेत्र
श्रोत्यांनीच करून पारख
ठरवले त्यांना सरस्वतीपुत्र

जरी दुःखाची झळ लागली
तरी सदानंदी जीवन जगले
दुःखालाही विषय मानून
दुःखावरही व्याख्यान दिले

सहवास तुमचा आज नाही
ही एकच माझी खंत ठरली
वक्तादशसहस्त्रेषुस दिलेली
कविताच माझी श्रद्धांजली

© गंधार विश्राम कुलकर्णी
संपर्क - ९१५८४१६९९८

Saturday, November 23, 2024

गरम पोळी आपल्या घरी खावी !

लक्ष्मी पूजन आणि तुळशीचे लग्न झाले की लग्नाच्या तिथी सुरु होतात. कधी कधी तर एकाच महिन्यात दहा-बारा लग्नात किंवा लग्नानंतरच्या स्वागत समारंभात जावं लागतं. मग अशा ठिकाणी अनेक लोकं भेटतात आणि अनेक लोकांच्या विविध विचित्र सवयीसुद्धा बघायला मिळतात. कधी कधी आपल्याही डोक्यात कोणतेच विचार नसलेत की आपण समोरच्या लोकांचं निरीक्षण करायला लागतो आणि त्यात काही विचित्र वाटलं तर त्याचा विचारही करायला लागतो. कामाच्या व्यस्ततेत तर असं निरीक्षण वगैरे काही होत नाही. पण शनिवारच्या संध्याकाळी एखाद्या ठिकाणी जाण्याचा योग आला आणि तिथे जर असं काही आढळलं तर मग विचारचक्र सुरु होऊन अशा लेखांचा जन्म होतो.

काल संध्याकाळी आम्ही एका लग्नात गेलो होतो. आता लग्न म्हंटलं की अनेक प्रकारचे पदार्थ आणि त्यात काही पदार्थांमध्ये विविधताही बघायला मिळते. प्रत्येक लग्नात काही ठराविक पदार्थांसमोर तो पदार्थ मिळविण्यासाठी लोकांची धडपड सुरु असते. उदा. पाणीपुरी, नूडल्स, आइसक्रीम आणि गरम पोळी. कालच्या लग्नातसुद्धा गरम पोळी मिळविण्यासाठी होणारा एक छोटासा संघर्ष मी बघितला. कालच्या लग्नात पोळ्यांचे दोन टेबल लावलेले होते. त्यात एका ठिकाणी गरम पोळ्या करून ठेवलेल्या होत्या तर बाजूलाच दुसऱ्या टेबलवर तव्यावरची टम्म फुगलेली पोळी थेट ताटात मिळत होती. तिथेच गरम पोळी मिळविण्यासाठी लोकांची गर्दी जमलेली होती. मी तिथे गेलो तर माझ्यासमोर सूट-बूट घातलेले आणि जरा सभ्य वाटणारे दोन माणसं उभे होते. पोळ्यावाल्या बाईने एक पोळी गरम केली आणि त्या दोघांपैकी एकाच्या ताटात पोळी टाकणार इतक्यात दुसऱ्या माणसाने "मी पण इथे उभा आहे, आधी मला पोळी द्या" असं म्हणून थोडा वाद घातला. तिथला वाद बघून मी बाजूच्या टेबलवरील भांड्यातील थोडी कोमट झालेली पोळी घेऊन माझं जेवण पूर्ण केलं आणि आम्ही घरी आलो.

आता असे कित्येक प्रसंग प्रत्येक लग्नात घडतात आणि आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपलं काम करतो, जसं मीसुद्धा केलं. पण कधी अशा घटनांचा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की आपण किती आत्मकेंद्रित व स्वार्थी होत आहोत. खाण्याची हौस असणारे आणि आवडीने प्रत्येक पदार्थाचा आस्वाद आणि आनंद घेणारे खूप लोकं मी बघितले आहे. पण असे वाद बघितल्यावर, गरम पोळी मिळाली नाही किंवा पोळी दुसऱ्याला आधी मिळाली म्हणून एखाद्या समारंभात वाद करण्याइतके आपण संकुचित विचारांचे आणि वृत्तीचे होत आहोत का ? असा प्रश्न मनात निर्माण होतो. आपल्या घरी गरम पोळीवर तूप घेऊन खाणे ही गोष्ट वेगळी आहे, पण तशीच गरम पोळी आपल्याला सगळीकडे मिळालीच पाहिजे, असा हट्ट करणे, हे किती मूर्खपणाचं लक्षण आहे.

विषय गरम पोळीवरून सुरु झाला, पण आपण कधी या गोष्टीचा विचार करतो का की अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड करणे, वाद करणे याचा किती वाईट परिणाम आपल्या मनावर आणि तब्बेतीवर होऊ शकतो. सुख आणि समाधान अनुभवण्यासाठीच आयुष्यभर आपण धडपड करत असतो. पण अशा क्षुल्लक गोष्टींना अति-महत्त्व देऊन आपण चिडचिड करत असू तर सुख आणि समाधान मिळणे तर दूरच उलट आपल्यामध्ये नकारात्मकता वाढत जाते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत आपण काही तरी वाईट शोधत रहातो आणि त्या गोष्टीचा आनंद घेण्यापासून मुकतो. अशी वृत्ती वाढत गेली तर काही क्षणांसाठी का होईना पण इतर लोकं आपल्याकडून दुखावले जातात. इतर लोकांचं सोडा पण अशा विचित्र वृत्तीमुळे आपल्या स्वतःच्या जीवनातील शांतता नक्कीच भंग होते. त्यामुळे एक सुखी, समाधानी, शांत व चांगलं जीवन जगण्यासाठी तरी आपण अशा विचित्र सवयी नव्हे चोचले कमी करावे आणि चांगलं जीवन जगण्याची सवय स्वतःला लावावी.

आणि तरीही गरम पोळी खाण्याची इच्छा झाल्यास, इतरांच्या समारंभात राडा न करता, प्रत्येकाने स्वतःला जशी लागेल तशी गरम पोळी आपल्या घरी खावी !

© गंधार कुळकर्णी
  ९१५८४१६९९८

Friday, May 17, 2024

आठवणीतली विजुकाकू

उन्हाळ्याच्या सूट्या सुरू असल्यामुळे निवांतपणे घरातले कामं करता येतात. २ मे चा दिवससुद्धा असाच होता. सकाळी मी आणि विश्राम घरातले कामं करत होतो. गंधार परीक्षेच्या कामासाठी कॉलेजमध्ये गेला होता. स्वयंपाक घरातले कामं झाल्यावर मी मोबाईल बघितला तर त्यात आशुदादाचा मेसेज आला होता. मेसेज वाचून विजुकाकू गेल्याचं कळलं. २३ तारखेपासून दवाखान्यात भरती असलेली विजुकाकू आमच्यातून निघून गेली होती. मन सुन्न झालं होतं. पहिले रामकाका, नंतर माझे वडील (दादा), त्यानंतर माझी आई आणि आता काकू या सर्वांच्या जाण्यामुळे परिवारातील चैतन्य, वैभव, आधार निघून गेला होता. संध्याकाळी ५ वाजता काकुची अंतिम विधी होणार होती. आम्ही १२:३० वाजता घरून निघालो. प्रवासात असतांना रस्त्यावरील झाडांप्रमाणे प्रत्येक जुनी आठवण डोळ्यांपुढे येत होती आणि क्षणात धूसर होत होती.

१९९५ च्या जुलै महिन्यात माझं लग्न विश्रामसोबत जुळल्यावर, मला पहिली साड़ी देणारी विजुकाकू एकदम माझ्या डोळ्यासमोर आली आणि माझे डोळे पाणावले. १९९७ साली गंधारचा जन्म झाला तेव्हा रामकाका आणि विजुकाकू अमेरिकेला गेले होते. दादांनी रामकाकांना गंधारच्या जन्माची बातमी कळवली. तेव्हा विजुकाकुला इतका आनंद झाला की तिने अमेरिकेतून गंधारसाठी ड्रेस आणले होते. गंधार चार महिन्याचा होता तेव्हा विश्रामचा फार मोठा अपघात झाला. आजही ते दिवस आठवले की अंगावर काटा उठतो. पण अशा कठीण काळातसुद्धा विजुकाकू अतिशय खंबीरपणे आमच्यासोबत होती. अपघाताच्या स्थळावरून विश्रामला नागपूरच्या दवाखान्यात नेण्यात आले. तेव्हा आम्ही दवाखान्यात पोहोचण्याआधी विजुकाकू तिथे उपस्थित होती. पुढे आमच्या संघर्षाच्या काळातसुद्धा विजुकाकुने विश्रामचा मुलाप्रमाणे सांभाळ केला.

पुढे आमच्या घरांचे वास्तु, गंधारचा उपनयन संस्कार या सगळ्या आनंदाच्या क्षणी तारे व कुलकर्णी परिवारातील वडीलधाऱ्या व्यक्तींप्रमाणे रामकाका व विजुकाकू आम्हाला आशीर्वाद द्यायला उपस्थित होते. रामकाका व काकुंमुळे आमचा मंगेशकर परिवाराशी संबंध आला आणि मला पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीतावर संशोधन करण्याची परवानगी मिळाली. संशोधनाचे कार्य सुरू असतांना दादा आणि रामकाका माझ्यासोबत होते. पण जेव्हा या संशोधन प्रबंधावरील पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा दादा आणि रामकाकांची उणीव विजुकाकुने भरून काढली. माझ्या आग्रहासाठी विजुकाकू, आशुदादा आणि मनीषा वहिनीने त्यांच्या नागपूरच्या घरी पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या हस्ते माझ्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा संपन्न करून घेतला. तेव्हा विजुकाकुने स्वतः माझ्या 'हृदय संगीत' पुस्तकाचे प्रकाशन केले होते. पुढे एकदा विजुकाकू भारती मंगेशकर (हृदयनाथ मंगेशकरांच्या पत्नी) यांना आमच्या घरी घेऊन आली होती. तो दिवस तर फारच अविस्मरणीय आणि अवर्णनीय आहे.

कोरोनानंतर विजुकाकू अतिशय थकली होती. तरीही मोठ्या महाराजांच्या (भाऊसाहेब शेवाळकर) पुण्यतिथीला स्वतः इथे यायची आणि शास्त्र शुद्ध पद्धतीने सर्व विधी करून घायची. माझ्याकडे या पुण्यतिथी उत्सवात ब्राम्हणांना सोवळ्यात वाढण्याचं काम असतं. सर्व काम झाल्यावर आमचे जेवणं होईपर्यंत समोर थांबणारी विजुकाकू, अधून-मधून माझी आणि विश्रामची गंमतसुद्धा करायची. गंधारने लिहिलेल्या लेख व कवितांचे तिला फार कौतुक होते. गंधारने रामकाकांवर लिहिलेली कविता विजुकाकू सर्वांना आवर्जून दाखवत असे.

विजुकाकू उत्कृष्ट शिक्षिका झाली असती, असे माझे दादा मला नेहमी सांगायचे. कारण काकुला मुलांना शिकविणे फार आवडत होते. पण रामकाकांचा एवढा मोठा व्याप, नावलौकीक, त्यात घरातील सण, उत्सव त्यामुळे घरात सतत पाहुण्यांची वर्दळ असायची. शेवाळकरांचा हा डोलारा सांभाळत असतांना  विजुकाकुने आपली आवड बाजूला ठेवली. कारण रामकाकांच्या चेहऱ्यावरील आनंद तिला सर्वात जास्त महत्वाचा होता.
एकदा रामनवमीच्या उत्सवाला काकू अचलपूरला आली असतांना, घरी जेवायला आली, आम्हा तिघांनाही खूप आनंद झाला. पुढे उत्सवाचे काम करतांना ती माझ्याकडे कौतुकाने बघत होती, मग मी काकूच्या गळ्यात पडून माझा लोभ करुन घेतला.

'नेहमी सर्वांचं कौतुक करणारी, नेहमी सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी विजुकाकू आज आपल्यात नाही.' या गोष्टीवर विश्वासच बसत नाही. अजूनही असं वाटतं की मोठ्या महाराजांच्या उत्सवाच्या दोन दिवसआधी काकुचा फोन येईल आणि ती म्हणेल,"तुम्हाला तिघांना इकडेच यायचं आहे बरं !" असं असलं तरी यावेळी मोठ्या महाराजांच्या उत्सवात डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसलेली विजुकाकू आता तिथे दिसणार नाही. याचं दुःख नेहमीकरीता राहिल...

© डॉ. जयश्री विश्राम कुलकर्णी
संपर्क क्र. - ९२८४५८३७९७

Wednesday, September 27, 2023

भगत सिंह

बहरलेल्या पिकांतूनी
वाऱ्यासम धावत होता
क्रांती करण्यासाठी तो
मातीत शस्त्रे पेरत होता

रक्ताळ लाल माती त्याने
घरात ठेवून पूजली होती
उध्वस्त करेल गोरी सत्ता
गाठ मनाशी बांधली होती

ध्येयपूर्तीसाठी आता
गृह त्यागाची वेळ आली
भगत छाव्याला तेव्हा
पंजाब सिंहाची भेट झाली

पाहणी करण्या भारताची
सायमन कमीशन आले
सायमन परत जा स्वदेशी
ही गर्जना हिंदलोकी चाले

सॉंडर्सचा आदेश होता
लाठीचा भडीमार झाला
लालाजी पडले खाली
मोर्चा तो मागे हटला

हिंसेला उत्तर देण्यास
आता हिंसाच करणार
रक्ताळ लाल रस्त्याला
आम्ही रक्तानेच धुणार

बहिऱ्यांना ऐकविण्यासाठी
आपण मोठ्यानेच बोलू
'इंकलाब'चा नारा देऊन
सगळे आनंदात डोलू

शेवटची घडी आली
'रंग दे बसंती' गाऊया
चला फासावर लटकून
आपण अमर होऊया

© गंधार कुलकर्णी
  ९१५८४१६९९८

Monday, July 3, 2023

मानवता

वाणीची शुद्धता । होतसे मंत्राने ।
जीवा सुखविणे । श्रेष्ठ भक्ती ।।

आत्मज्ञान असे । जीवनाचे ज्ञान ।
त्यास मिळवून । संतोषावे ।।

राष्ट्रासाठी कार्य । सेवा समाजाची ।
चिंता या विश्वाची । कर्म खरे ।।

ईश्वराचा वास । प्रत्येक जीवात ।
ठेवावी मनात । भूतदया ।।

सांगतो गंधार । भेद विसरूनी ।
जपावी सर्वांनी । मानवता ।।

© गंधार कुलकर्णी
दि. २२ एप्रिल २०२०

Wednesday, May 3, 2023

ग्रंथालय : माझं दुसरं घर

शाळा किंवा महाविद्यालय म्हंटलं की प्रत्येकाच्या जीवनातील अनेक गोड आठवणींना उजाळा मिळतो आणि एखाद्या चलचित्राप्रमाणे सर्व आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहतात. माझ्याही बाबतीत असच काहीसं घडलं, जेव्हा मला जगदंब महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख डॉ. वानखडे मॅडम यांनी महाविद्यालयीन जीवनातील अनुभवांवर लेख लिहायला सांगितला. तेव्हापासून गवतावर असंख्य दवबिंदू जमावे त्याप्रमाणे मनाच्या विविध कोपऱ्यात असलेल्या अनेक आठवणी एकत्र जमू लागल्या. सततचे कामं आणि न लाभणारी शांतता यामुळे आठवणींना कागदावर उतरवणं कठीण होऊ लागलं. शेवटी "शनिवार-रविवारमध्ये लेख लिहून पूर्ण करायचा" असं ठरवलं आणि लिहायला सुरवात केली.

२०१८ मधील जून महिन्याच्या शेवटी-शेवटी जगदंब महाविद्यालयामध्ये माझा प्रवेश झाला आणि दोन-तीन दिवसानंतरच मी महाविद्यालयात जाण्यास सुरवात केली. एम. ए. इतिहासाची प्रवेशप्रक्रिया सुरू असल्यामुळे इतर विद्यार्थी महाविद्यालयात अद्याप येत नव्हते. त्यामुळे सुरवातीचे बरेच दिवस मी एकटाच इतिहासाच्या वर्गात बसायचो. आमचे विभागप्रमुख प्रा. टाले सर अनेकवेळा विनोदाने म्हणायचे,"यावर्षी गंधार आपला एकटाच विद्यार्थी आहे" प्रा. माहोरे सर व प्रा. भटकर सरांनी मला अभ्यासक्रम आणि पुस्तकं सांगितले. 'एक विद्यार्थी असला तरी वर्ग घेणं' ही गोष्ट इतिहास विभागाने मला शिकवली. वर्ग झाल्यावर इतर विद्यार्थी नसल्यामुळे मी ग्रंथालयात पुस्तकं घेण्यासाठी गेलो. तेव्हा कला शाखेच्या विद्यार्थ्यांना पुस्तकं देणाऱ्या ग्रंथालयातल्या नाना काकांनी बी.टी. कार्ड काढण्यासाठी पावती मागितली आणि "दोन-तीन दिवसांनी ये" असं सांगितलं. मी टाले सरांना सांगून घरी आलो. पुस्तकं न मिळाल्यामुळे नोट्स लिहायला सुरवात होऊ शकली नाही. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा सकाळी ग्रंथालयामध्ये पोहोचलो. नाना काका आणि स्वप्निल दादा समोरच बसले होते. "बी.टी. कार्ड तयार झालं का काका ?" मी विचारलं आणि बी.टी. कार्ड मिळेपर्यंत तिथेच उभा राहिलो. शेवटी काकांनी मला बी.टी. कार्ड दिलं. त्यानंतर पुस्तकं घेतले आणि वाचन सुरू केलं. जेव्हा मी पहिल्यांदा ग्रंथालयात गेलो, तेव्हा समोर हजारो पुस्तकं पाहून खेळण्याच्या दुकानात गेल्यावर लहान मुलाची जशी अवस्था होते, तशी अवस्था माझी झाली होती. त्यामुळे 'रोज वर्ग झाल्यावर आपण ग्रंथालयामध्ये एक चक्कर मारायचाच' असं मी मनाशी ठरवलं.

त्यानंतर रोज वर्ग झाल्यावर मी ग्रंथालयात जायला लागलो. नाना काका, स्वप्निल दादा, डॉ. बेलसरे सर, मारुती काका यांच्यासोबत रोज बोलणं सुरू केलं. त्यामुळे ग्रंथालयातील पूर्ण स्टाफसोबत माझी चांगली ओळख झाली. जेव्हा आमची पुस्तक बदलवण्याची तारीख असायची तेव्हा मी नाना काकांना, "तुमची मदत करू का ?" असं विचारायचो आणि काकांनी होकार दिला की पटापट विद्यार्थ्यांना पुस्तकं बदलवून द्यायचो. नाना काकांची पुस्तक वाटण्यात मदत केल्याचे मला अनेक फायदे झालेत, ते म्हणजे ग्रंथालयातील खूप पुस्तकांची व त्यातील मजकूराची मला माहिती झाली, पुस्तकांची नोंदणी व विषयानुसार विभागणी कशी करतात ते कळलं, महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांसोबत ओळख झाली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मला माझ्या बी.टी. कार्ड वर दोनपेक्षा जास्त पुस्तकं मिळू लागले. बेलसरे सर आणि नाना काकांनी माझ्यातला 'पुस्तकप्रेमी' हेरला आणि "पाहिजे तेवढे पुस्तकं वाच !" असं विश्वासाने मला सांगितलं. त्यानंतर ग्रंथालयाच्या समितीसाठी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून माझी निवड झाली. रंगनाथन जयंतीच्या कार्यक्रमामध्ये मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली. ग्रंथालयासाठी पुस्तकं मागवण्याच्या वेळी बेलसरे सर मला आवर्जून सांगायचे आणि माझ्याकडून पुस्तकांची यादी मागवायचे. एका विद्यार्थ्याचे मत विचारात घेऊन ग्रंथालयात पुस्तकं आणणे. ही एका विद्यार्थ्यासाठी फार मोठी गोष्ट असते आणि अशा गोष्टींमुळे विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढत असतो.

'हा विद्यार्थी नेहमी ग्रंथालयात बसलेला असतो.' असं लक्षात आल्यावर तत्कालीन मराठी विभागप्रमुख डॉ. गडकर मॅडम यांनी मला काही ठराविक पुस्तकं वाचायला दिले. स्वामी विवेकानंदांवरील अनेक पुस्तकांचं वाचन झाल्यामुळे इंग्रजी विभागातील प्रा. पाटील सरांनी वक्ता म्हणून मला पहिली व्याख्यानाची संधी दिली. एवढच नव्हे तर संस्थेचे अध्यक्ष श्री. रमाकांतजी शेरकार सर, प्राचार्य डॉ. रोहणकर सर तसेच महाविद्यालयातील प्रा. मुळे सर यांच्यासोबत सुद्धा एक-दोन वेळा पुस्तकांविषयी चर्चा झाली. ग्रंथालयाशिवाय माझा महाविद्यालयातील इतर सर्वच विभागांशी जवळून संबंध आला. पण त्याची सुरवात ग्रंथालयापासून आणि ग्रंथालयामुळे झाली, म्हणून लेख लिहितांना ग्रंथालयाविषयी अनुभव लिहावे असं मी ठरवलं होतं. माझं विद्यार्थी जीवन संपलं आणि तासिका तत्वावरील प्राध्यापक म्हणून मी पुन्हा जगदंब महाविद्यालयात काम करायला सुरवात केली. महाविद्यालयातील माझी भूमिका थोडी बदलली. पण विद्यार्थी असतांना सर्व प्राध्यापक व क्लरीकल स्टाफसोबत जे मैत्रीचं नात जुळलं ते अजूनही तसच कायम आहे.

हे सर्व लिहिण्याचं तात्पर्य म्हणजे की 'प्रेमानी बोलून सुद्धा महाविद्यालयातील आपले सर्व कामं होऊ शकतात' ही गोष्ट आजच्या विद्यार्थ्यांना जाणून घेण्याची आणि आचरणात आणण्याची फार आवश्यकता आहे. कारण विद्यार्थ्यांच्या वागण्या-बोलण्यामुळे त्यांचे होत असलेले कामं बिघडतांना मी पाहिले. खरं सांगायचं झालं तर शाळा-महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व मदत करण्यासाठीच असतात आणि हेच लोकं विद्यार्थ्यांचे चांगले मित्रही बनू शकतात. फक्त आपल्यामध्ये मैत्री करण्याची कला व हिम्मत असायला हवी. कोणत्याही मुलाला त्याचे पहिले मित्र घरातून भेटतात आणि ते त्याचे आई-वडील असतात. या तत्वानुसार विचार केल्यास महाविद्यालयामधील मला माझे पहिले मित्र ग्रंथालयात भेटले. म्हणून जगदंब महाविद्यालयातील ग्रंथालयाला मी माझं दुसरं घर समजतो.

गंधार विश्राम कुलकर्णी
   (९१५८४१६९९८)
     इतिहास विभाग
जगदंब महाविद्यालय,
         अचलपूर

Sunday, January 29, 2023

चाहता हूँ


अब तक जो सोचता था
वो बयां करना चाहता हूँ
इशारों में बोल नहीं पाया
लफ्जों से कहना चाहता हूँ

जिसकी मंजिल तुम हो
वो पथ चलना चाहता हूँ
जो सिर्फ तुम तक पहुंचे
वो खत लिखना चाहता हूँ

हर रात जो तुम देखो
वो सपना होना चाहता हूँ
हर पल तुम्हारे साथ हो
ऐसा अपना होना चाहता हूँ

तुम्हारे हाथों में रहनेवाली
प्रेम की लकीर होना चाहता हूँ
जिसकी हर दुआ में तुम रहो
ऐसा फकीर होना चाहता हूँ

जिसमें तुम्हारी यादें हो
वो डायरी लिखना चाहता हूँ
जिसकी तुम प्रेरणा हो
वो शायरी लिखना चाहता हूँ

तुम्हारी जिंदगी का हसीन
किस्सा बनना चाहता हूँ
तुम्हारी जिंदगी का अभेद
हिस्सा बनना चाहता हूँ

जो तुम्हारे बाद आए
वो नाम बनना चाहता हूँ
अगर तुम सीता बनी
तो मैं राम बनना चाहता हूँ

© गंधार कुलकर्णी
२५ जानेवारी २०२३

Thursday, January 5, 2023

रस्त्यावर मिळालेली शिकवण...

 
सध्या सर्व शाळा-महाविद्यालयांमध्ये परीक्षेची धावपळ सुरू आहे. त्यात आमच्या महाविद्यालयातील परीक्षेची जबाबदारी आईकडे असल्यामुळे ही धावपळ आम्हाला जरा जास्तच जाणवते. रोज सकाळी आणि दुपारी दोन्ही शिफ्टमध्ये पेपर असल्यामुळे आई आणि मी सकाळी ८ वाजता घरून निघालो की सर्व कामं संपवून घरी यायला संध्याकाळचे ६ वाजतात. सकाळचा पेपर झाल्यावर बाबांनी आणलेला डबा आम्ही जेवतो आणि पुन्हा कामाला लागतो. परीक्षा केंद्र व्यवस्थित राहावं यासाठी अनेकवेळा आम्हाला स्वतःच्या मूळ स्वभावापेक्षा विरुद्ध वागावं लागतं. आपण कितीही मनमिळावू आणि बिनधास्त स्वभावाचे असलो तरीही आवश्यकतेपेक्षा जास्त कडकपणे वागावं लागतं. खरं तर विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात एका बारीक धाग्याप्रमाणे जो फरक असतो तो कायम ठेवण्यासाठी असं वागावं लागतं. कॉलेजचे आणि परीक्षेचे कामं, विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या समस्या, ऐन कामाच्या वेळेत भेटायला येणारे अनेक लोकं, इतर महाविद्यालयातले मार्गदर्शन घ्यायला येणारे काही विद्यार्थी अशा सर्व गोष्टी पूर्ण करून आम्ही घरी येतो. गेल्या एक-दीड महिन्यांपासून वरीलप्रमाणे आमची दिनचर्या सुरू आहे. कधी कधी कामाच्या तणावामुळे थोडी चिड-चिड सुद्धा होते. दुनियादारीच्या नावाखाली मनाला पटत नसलेल्या गोष्टी कराव्या लागल्या की रात्री झोपण्यापूर्वी एक प्रश्न निर्माण होतो. "आपल्या स्वभावातील कृत्रिमता वाढत तर नाही चालली ?"

असं यंत्राप्रमाणे काम करत राहण्याचा आणि अतिशय व्यस्ततेच्या इतर दिवसांसारखा आजचाही दिवस असेल असं कॉलेजमधून निघतांना मला वाटलं. आई आणि मी कॉलेजमधून निघालो आणि परतवाड्यातील वाघामाता मंदिरासमोरून आमची गाडी जात असतांना मनाला आनंद व समाधान देणारा एक छोटासा प्रसंग घडला. वाघामाता मंदिराजवळ एक झोपडपट्टी आहे. बरेचदा संध्याकाळच्या वेळी झोपडपट्टीतील लहान मुलं खेळता-खेळता रस्त्यावर येतात. त्यामुळे तिथून जात असतांना गाडी थोडी हळूच चालवावी लागते. आजसुद्धा झोपडपट्टी समोरून जात असतांना मी गाडीची स्पीड कमी केली. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने कुत्र्याचं एक छोटं पिल्लू हळूहळू चालत रस्ता पार करत होतं आणि त्याच बाजूने एक ट्रक भयंकर वेगात येत होता. तेवढ्यात झोपडपट्टीतील एका लहान घरातून एक लहान मुलगी रस्त्यावर धावत आली आणि कुत्र्याच्या पिल्लाला उचलून डिवाइडरपर्यंत घेऊन गेली. तिने डिवाइडरवर पिल्लाला सोडलं आणि पुन्हा धावत आपल्या घरात गेली. आम्ही गाडीतून हे सर्व बघत होतो. काही क्षणात घडलेला हा प्रसंग होता.

आम्ही घरी पोहोचलो. मी आणि आईने हा प्रसंग बाबांना सांगितला. आमच्या घरीसुद्धा एका मांजरीने काही महिन्याआधी तीन पिल्लं दिले. तेव्हापासून आम्ही त्यांना कॅटफूड आणि दूध देत आहोत. गाडीचा आवाज आला की तीनही पिल्लं धावत येतात, पायाशी खेळतात, बाबांसोबत पाळण्यावर बसतात. दिवसभरातील कामाचा थकवा या तीन पिल्लांना बघून निघून जातो, मन प्रसन्न होतं, चेहऱ्यावर आनंद येतो. असं का होतं ? याचा विचार आपण केला आहे का ? रोज आपण कित्येक लोकांसोबत वावरतो. त्यात गरीब, श्रीमंत, विद्वान, चतुर, चापलूस, मुफट अशा अनेक प्रकारचे लोकं असतात. तरीही त्यांच्यासोबत आपण ठराविक काळापेक्षा जास्त राहू शकत नाही. परंतु पक्षी किंवा प्राण्यांचा सहवास आपल्याला इरिटेड होत नाही. एखाद्या वेळेस आपण रस्त्यावर पडलेल्या माणसाकडे दुर्लक्ष करू पण एखाद्या प्राण्याला गाडीमुळे काही दुखापत झाली तर आपल्याला काही क्षण तरी वाईट वाटतं.

आज अनेक लोकं माणसांपेक्षा जास्त प्राण्यांवर प्रेम करतात. या सर्व भावनिक भानगडीचं मुख्य कारण म्हणजे माणसांमध्ये घटत असलेली निरागसता व सरलता आणि वाढत असलेली कृत्रिमता आहे, असं मला वाटतं. माणसाचे पिल्लं मोठं झालं की त्याच्यातील निरागसता कमी होते आणि कृत्रिमता वाढते. परंतु प्राण्यांच्या पिल्लांबाबत असं होत नाही. खरं तर माणूस जितका उच्चशिक्षित, सुसंस्कृत, श्रीमंत व विद्वान होतो आहे, तितकी त्याच्यातील कृत्रिमता वाढत आहे. प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांच्या 'वाइज अँड अदरवाइज' या पुस्तकातील एका लेखामध्ये त्यांनी रस्त्यावरील एका भिकाऱ्याचं उदाहरण देऊन तो इतर श्रीमंत लोकांपेक्षा कसा जास्त सुखी आहे, हे सांगितलं आहे. प्राणी, पक्षी किंवा लहान मुलांकडे बघून आपल्याला आनंद होत नसतो तर आपल्याला आनंद देत असते त्यांच्यातील निरागसता व सरलता. 'झोपडपट्टीतील मुलगी आणि रस्त्यावरील कुत्र्याचं पिल्लू' हा प्रसंग जरी काही क्षणात घडलेला असला तरी त्यातून एक फार महत्वपूर्ण शिकवण मला मिळाली. सुखी व आनंदी जीवन जगण्यासाठी निरागसता व सरलता खूप आवश्यक आहे. जी त्या झोपडपट्टीतील मुलीमध्ये आणि रस्त्यावरील कुत्र्याच्या पिल्लामध्ये होती.

© गंधार कुलकर्णी
५ जानेवारी २०२३

Friday, November 11, 2022

सूटीतील सोन्याचा दिवस

कोरोनाची दीर्घ सूटी लागल्यापासून आम्ही सर्व घरातच बसून होतो. १६ मार्च पासून सर्व बंद झालं आणि एक-दोन दिवसातच घर नकोसे व्हायला लागले. पण काही उपाय नसल्याने पुढच्या एक-दोन दिवसात माझ्या दिनचर्येत मोठा बदल झाला, नव्हे तो मीच केला. विचित्ररात्रयोग व अवेळीनिद्रायोग अशा दोन योगांचा माझ्या कुंडलीत शिरकाव झाला आणि पहाटे ४ वाजता झोपणे, सकाळी ११ वाजता उठणे, पाहिलेले सिनेमे पुन्हा पुन्हा पाहून कंटाळाशी झुंज देणाऱ्या मनाला थोडे रमवून घेणे हेच सुरू होतं. दिवसातून एकदा थोडा अभ्यास करून अभ्यासक्रमाच्या पुस्तकांना सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न मी करत होतो. 'Whatsapp वर आलेले कोडे सोडवणे' हा एक नवीन उपक्रम तिघांच्याही दिनचर्येचा भाग झाला होता. आई-बाबांनी केलेल्या विविध पदार्थांवर रोज ताव मारणे सुद्धा सुरू होते. अशातच २३ मार्चला दुपारी हर्षू काकाचे "येशु ख्रिस्तावर कविता करतो का ?", "आवडली तर यु ट्युबवर येईल" असे मेसेज आले. मी सुद्धा होकार दिला आणि कवितेसाठी विचारप्रक्रिया सुरू झाली. ख्रिस्ताची माहिती मिळवण्याची मोहीम मी हाती घेतली. रात्रीपर्यंत 'ख्रिस्त दिसतो मला' असे शीर्षक ठरले. 

२४ मार्चचा दिवस येशू ख्रिस्ताचे दोन सिनेमे, त्याच्या जीवनावरील अनेक प्रसंग व लियोनार्डो दा विंसीने रेखाटलेले चित्र अभ्यासण्यात गेला. रात्रीपर्यंत सुद्धा शीर्षकापुढे पेन काही गेला नाही. जेवण झाल्यावर कुसुमाग्रजांचे विशाखा व समिधा हे दोन काव्यसंग्रह चाळलेत. ख्रिस्त दिसतो, पण कुठे दिसतो ? कोणामध्ये दिसतो ? असा विचार करत असतांना पहिल्या काही ओळी जन्माला आल्यात आणि समाजातील असहाय्य स्त्रीमध्ये मला ख्रिस्त दिसला. तेव्हा रात्रीचे ३:३० वाजले होते. दुसऱ्या दिवशी 'The Last Supper' या प्रसंगाचा संबंध आजच्या वृद्ध माणसाच्या अंतिम स्थितीशी जोडून त्यावर दुसरे कडवे लिहून झाले. सद्य परिस्थितीत वर्तमान आणि भविष्याच्या प्रश्नामध्ये अडकलेला तरूण व क्रुसाच्या प्रतिमा एकत्रित झाल्या. कविता पूर्ण झाली होती पण मी असमाधानी होतो. २५ तारखेला संध्याकाळी कविता हर्षू काकाला पाठवली. आता परत कवितेची डागडुजी सुरू होऊन तिसऱ्या कडव्यात बदल केला. आजही आपल्याला ख्रिस्त समजला नाही असा शेवट करून, जुडासाचा दोष स्वतःवर घेउन कविता पूर्ण झाली. ही कवितेची प्रक्रिया चालू असतांना 'क्रुसाच्या कविता' या यू ट्यूब चॅनलचे संचालक डॉ. अमित त्रिभुवन ह्यांच्या सोबत संपर्क साधला होता. त्यामुळे २६ तारखेला सकाळी त्यांना कविता, अल्पपरिचय व एक फोटो Whatsapp वर पाठवला.

२७ तारखेला सकाळी उठलो तेव्हा कवितेचा वीडियो यू ट्यूब चॅनलवर आल्याचे नोटिफिकेशन स्क्रीनवर झळकत होते. Whatsapp, Facebook वर वीडियोची लिंक पाठवली. दिवसभर सर्वांचे कौतुकाचे मेसेज येत होते. वीडियो पाहण्याऱ्यांची संख्या वाढत होती. अनेक विद्वान व अभ्यासू लोकांच्या प्रतिक्रिया येत होत्या. संध्याकाळी हिस्लॉप कॉलेजचे माजी प्रचार्य डॉ. सुभाष पाटील सरांसोबत बोलणे झाले. वृद्ध बापासाठी येशूच्या प्रतिमेचा उपयोग त्यांना विशेष आवडला होता. त्यानंतर महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रातील एक विद्वान व्यक्ती म्हणजे डॉ. अनुपमा उजगरे यांच्याशी भरपूर चर्चा झाली. सूर्याने एखाद्या छोट्या दिव्यासोबत उजेडाची चर्चा करावी तसा अनुभव मला डॉ. अनुपमा उजगरेंसोबत बोलतांना आला. रात्री अमित सरांनी दिवसभरात आलेल्या प्रतिक्रिया मला पाठवल्या. त्यात विजय कोल्हटकरांचा (समाजशास्त्रज्ञ डॉ. उषादेवी कोल्हटकर यांचे पती) मेसेज होता. आई-बाबांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि इतक्या विद्वान लोकांच्या प्रतिक्रिया पाहून, एका नवीन विषयावर कविता केल्याचे समाधान डोळ्याच्या वाटेने अलगद गालावर उतरले. त्या रात्री सुद्धा मी उशीरा झोपलो. पण झोप न येण्याचे कारण होते सूटीतील सोन्याचा दिवस जगल्याचे समाधान...

© गंधार कुळकर्णी
  ९१५८४१६९९८