Followers

Friday, June 12, 2020

तारे जमीन पर - एक आठवण

या 'लॉकडाउन'मध्ये अभ्यास बऱ्यापैकी मागे पडला आणि रोज वेगवेगळे सिनेमे बघणे सुरू आहे. रोज रात्री एखादा सिनेमा पाहायचा आणि दुसऱ्या दिवशी जेवतांना त्यावर चिकित्सा करायची अशी दिनचर्या आता झाली आहे. कविता, कथा, चित्रकला या सोबतच सिनेमा बघणे हा सुद्धा माझा छंद म्हणायला हवा. आज सुद्धा मी नेहमी प्रमाणे कोणाता सिनेमा पाहायचा हे ठरवत होतो तेव्हा 'झी-सिनेमा' या चॅनलवर 'तारे जमीन पर' हा सिनेमा नुकताच लागला होता. तिथेच माझी सिनेमाची शोध मोहीम संपली आणि मी रिमोट बाजूला ठेवले. सिनेमा तर सुरू होताच, पण सोबत मला माझे शाळेतले दिवस आठवले. आता 'तारे जमीन पर' माझ्या अतिशय आवडत्या सिनेमांपैकी एक आहे. पण जेव्हा हा सिनेमा रिलीज झाला होता. तेव्हा मी या सिनेमाच्या नावानी सुद्धा चिडायचो.

२००७ साली हा सिनेमा रिलीज झाला. मी तेव्हा पाचव्या वर्गात होतो. सिनेमा हिट झाला. पण शाळेत माझी प्रसिद्धी जास्त झाली. त्याचे कारण म्हणजे शाळेच्या हजेरीत माझे नाव 'गंधार विश्राम कुलकर्णी' असले तरी शाळेत मी 'दादासाहेब तारेंचा नातू' म्हणून ओळखल्या जायचो. या ओळखीचे फायदे खुप होते. पण सिनेमा आल्यामुळे आता मला सगळे 'तारे जमीन पर' म्हणून चिडवू लागले. त्यामुळे सिनेमा न पाहता तो फ्लॉप व्हावा अशी प्रार्थना मी करत होतो. चिडवण्याच्या प्रकरणात दोन-तीन मुलांना मी मनसोक्त बदाडले सुद्धा. पण त्याचा उलटा परिणाम म्हणजे शिक्षकांनाही माझी चिड माहीत झाली. त्यामुळे घरी मी नेहमी इरिटेट होऊनच येत होतो. खुप महिन्यांनंतर हे प्रकरण थांबले. चिडणे-चिडवणे सुद्धा बंद झाले होते.

१० वी मध्ये असतांना आजोबां मला इंग्रजीचा 'होमवर्क' करून देत होते. ११ वी पासून कला शाखा घेतल्यामुळे मी आजोबांचं खुप मार्गदर्शन घ्यायला लागलो. आजोबांचा संघर्ष आणि सर्वांचे जीवन सुधारण्याची तळमळ मला समजत होती. आता मला 'दादासाहेब तारेंचा नातू' या ओळखीचे महत्व समजत होते. बी. ए. पूर्ण होता होता 'दादासाहेब तारेंचा नातू' स्वतःच्या नावानी ओळखल्या जावू लागला. एम. ए. मध्ये ही ओळख पूर्ण विद्यापीठात झाली. या गोष्टीचा आंनद सर्वात जास्त आजोबांना होता. 'तारे' या नावाचे महत्व मला समजल्यामुळे शाळेतले मित्रांचे चिडवणे आता परत व्हावे असे वाटते. कधी मित्र भेटतात तेव्हा एखाद्याने 'तारे जमीन पर' म्हंटलं की मला आनंद वाटतो. हे सर्व लिहिण्याचे तात्पर्य काय ? तर ते असे की काही व्यक्ती आणि काही सिनेमे अनेक गोष्टी शिकवून जातात. आपल्याला ते सिनेमे आणि व्यक्तींसोबतचे क्षण जगता आले पाहिजे. घरातल्या व्यक्तींसोबत जगण्यासाठी वेळ काढा मित्रांनो. कारण सिनेमा आपण पुन्हा पाहू शकतो, पण गेलेल्या व्यक्तींच्या आपल्यासोबत फक्त आठवणी असतात, सहवास नाही.

© गंधार कुलकर्णी
दि. १२ जून २०२०

8 comments: