Followers

Friday, November 13, 2020

स्वच्छता : संस्कृती आणि संस्कार

 (खालील लेख अध्ययन समाचार 'सृजनोत्सव' दिवाळी २०२०च्या विशेषांकात प्रसिद्ध झाला आहे)


दिवाळी आता थोड्याच दिवसांवर आली आहे. दिवाळी म्हंटल की सर्वात पहिलं काम म्हणजे घर स्वच्छ करणे. सर्वच लोकं घराची स्वच्छता करतात, रंगरंगोटी करतात, घरातल्या अनेक जुन्या वस्तू बदलवून त्याच्या जागी नवीन वस्तू आणतात, थोडक्यात म्हणजे घर टापटिप व निटनेटके करतात. पण दिवाळीसाठी घर स्वच्छ करणे इतकं गरजेचं का आहे ? या प्रश्नाचं उत्तर भारतीय संस्कृती व संस्कारात आहे. भारतीय मान्यतेनुसार स्वच्छ व प्रसन्न ठिकाणी लक्ष्मीचा व सरस्वतीचा वास असतो. दिवाळीची स्वच्छता करण्यामागे सुद्धा हिच मान्यता असावी. त्यामुळे अनेक लोकं दिवाळीच्या पाच दिवसात झाडणी व फड्याची सुद्धा पूजा करतात. झाडणीलाही लक्ष्मी मानलं जातं. तसेच अभ्यंग स्नान करणे, उटणे लावणे हे प्रकार सुद्धा मानवी शरीराच्या स्वच्छतेसाठीच आहेत. प्रत्येक धर्मात पूजा, ध्यान-धारणा करण्याआधी शुचिर्भूत होणे, बाहेरून घरात येण्याआधी हात-पाय धुणे या सर्व गोष्टी स्वच्छतेचं महत्व सांगणाऱ्या आहेत. भारत देशाला स्वच्छतेचा खूप मोठा इतिहास आहे. त्याचे काही उदाहरणं खालीलप्रमाणे -


स्वच्छता म्हणजे भारतीय संस्कृतीच्या ठळक वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य आहे. प्राचीन भारतीय सिंधू संस्कृतीतील नगरांमध्ये भव्य स्नानगृहे, सांडपाण्याच्या झाकणबंद नाल्या आढळल्या आहेत. वैदिक साहित्यामध्ये सुद्धा घरातली स्वच्छता, आध्यात्मिक सोवळे, शौच, स्नान यासंबंधित नियम आखून दिले आहेत. त्यानंतर भारतात उदयास आलेल्या मौर्य साम्राज्यात सुद्धा स्वच्छतेवर भर दिलेला दिसतो. चाणक्यांनी आपल्या 'अर्थशास्त्र' या ग्रंथात समृद्ध राज्य उभारण्यासाठी शेती, व्यवसाय, राजकारण, स्वच्छता, समाज या सोबत १७० विषयांवर भाष्य केले आहे. अर्थशास्त्राच्या ८व्या व ३६व्या प्रकरणात राज्यातील स्वच्छतेचे नियम व नियमांचे उल्लंघन झाल्यास शिक्षा याबाबत माहिती लिहिली आहे. मौर्य, गुप्त, विजयनगर या साम्राज्यांत पाणी व स्वच्छता या घटकांवर जास्त लक्ष दिल्याचे उल्लेख आहेत. इस्लाम राजवटीच्या काळात संतांनी आपल्या साहित्यातून स्वच्छतेविषयी प्रबोधन केल्याचे आढळते. पुढे भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या काळात स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सुद्धा स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणात कार्य केले आहे. संत गाडगेबाबांनी गावोगावी जावून स्वच्छतेचे महत्व समाजाला पटवून दिले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 'ग्रामगीता' हा ग्रंथ लिहून खेड्यापासून-राष्ट्राच्या समृद्धतेसाठी स्वच्छतेचे महत्व सांगितले आहे.

आताच्या नवीन भारतात अण्णा हजारे, बिंदेश्वर पाठक या समाजसेवकांनी स्वच्छतेच्या नवीन चळवळी उभारल्या आहेत. सध्या कोरोना महामारीमुळे 'स्वच्छतेचे पालन करणे' ही बाब संपूर्ण मानव जातीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक झाली आहे. एखाद्या विशिष्ट प्रदेशातील लोकांची जीवन पद्धती, मान्यता, चाली-रीती म्हणजे संस्कृती होय. या व्याख्येनुसार बघितले तर प्राचीन भारतापासून आताच्या अत्याधुनिक भारतापर्यंत लोकांच्या जीवन पद्धतीत 'स्वच्छता' हा घटक कायम आहे. त्यामुळे स्वच्छता ही आपली संस्कृती आहे. असे म्हंटल्यास वावगे होणार नाही. प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत १६ प्रकारचे संस्कार सांगितले आहेत. पण मानवी जीवनात स्वच्छतेचे महत्व बघता स्वच्छता म्हणजे आपला १७ वा संस्कार आहे, असे आपण निश्चितच म्हणू शकतो. त्यामुळे स्वच्छता म्हणजे भारतीयांची संस्कृती व भारतीयांवरील संस्कार आहे, असे मी मानतो.

© गंधार विश्राम कुलकर्णी
संपर्क : ९१५८४१६९९८

No comments:

Post a Comment