'परीक्षा' एक असा विषय जो सध्या महाराष्ट्रात कोरोना रुग्ण व अंबानी प्रकरणानंतर सर्वाधिक चर्चेत आहे. याच विषयावर एक अल्पसा संवाद आज माझ्या घरात सुद्धा झाला. आज दुपारी मी UGC NET परीक्षेचा अभ्यास करत होतो. मला अभ्यास करतांना पाहून घरात काम करणाऱ्या बाईने सहजच विचारलं -
"अजून तुझी परीक्षा झालीच नाही का ?""नाही. पुढच्या महिन्यात परीक्षा आहे." मी सांगितलं.
"पण तुझं कॉलेज तर झालं न ?" पुन्हा तिच्याकडून दुसरा प्रश्न आला.
"अरे नाही, ही परीक्षा कॉलेजची नाही. सरकारी परीक्षा आहे. तसं पण माणसाच्या परीक्षा कधीच संपत नसतात." मी तिला हसून म्हणालो.
इथेच हा संवाद संपला आणि आम्ही दोघेही आपापल्या कामाला लागलो. शब्दांचा संवाद जरी संपला असला तरीही विचारांचा विवाद सुरू होता. गेल्या अनेक दिवसापासून परीक्षांच्या बातम्या वर्तमानपत्र व टी.व्ही. वर बघत होतो. त्यात टी.व्ही. वर एक बातमी अशी होती - 'परीक्षा होत नसल्यामुळे विद्यार्थ्याने केली आत्महत्या'. खरं तर टी.व्ही. वर दाखवण्यात येणाऱ्या घटनांमागे अनेक कारणं असू शकतात. त्यावर बोलायला नको. पण परीक्षांच्या वेळापत्रकांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहे ही बाब अगदी सत्य आहे.
माझी एम.ए.ची मार्च २०२० मध्ये होणारी अंतिम सत्राची परीक्षा नोव्हेंबर २०२० मध्ये झाली. प्रत्येक वेळी परीक्षेचे वेळापत्रक यायचे आणि काही दिवसात पुन्हा रद्द व्हायचे. असं तीन वेळा झालं. एकदा तर एक पेपर होवून पूर्ण परीक्षा रद्द झाली. मी सुद्धा चिडायचो-रागवायचो. या सर्व गोंधळामुळे थोडा frustrate झालो होतो. त्यावेळी आई-बाबा एकच वाक्य बोलायचे - "जाऊदे, आपण असाच विचार करायचा की जे होतं ते चांगल्यासाठी होतं" सांगण्याचं तात्पर्य हेच की सकारात्मक विचार करून आणि संयम ठेवून अभ्यास करावा. कारण इतर सर्व परीक्षांपेक्षा मोठी परीक्षा म्हणजे सध्याची स्थिती आहे. "जाऊदे, आपण असाच विचार करायचा की जे होतं ते चांगल्यासाठी होतं" हे वाक्य आपण सर्वांनीच ऐकलं असेल किंवा "Life में कुछ भी हो सकता है" हे वाक्य सुद्धा ऐकलं असेल. दैनंदिन जीवनात असे अनेक वाक्य आपण घरातल्या व बाहेरच्या लोकांकडून ऐकत असतो. विचार केला तर वरील दोन वाक्य प्रत्येक माणसाला जागृत करण्याचे कार्य करतात. त्यामुळे कोणतेही विचित्र व उलट पाऊल उचलण्याआधी वरील दोन वाक्यांचा आधार घेऊन स्वतःशीच बोलण्याची सवय करायला हवी. सध्या कोरोना व लॉकडाउनमुळे घरातल्यांसोबत वेळ घालवून अशा सकारात्मक विचारांना अंमलात आणण्याची आपल्याकडे एक चांगली संधी आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरातच आपले प्रेरणास्त्रोत बसलेले असतात. फक्त आपण प्रेरणा घ्यायला शिकलो पाहिजे. सुरवातीच्या संवादात सांगितल्याप्रमाणे परीक्षा कधीच संपत नसतात. शाळा-महाविद्यालयाने घेतलेल्या असो, सरकारने घेतलेल्या असो किंवा जीवनाने घेतलेल्या असो, आपण परीक्षेला कसं सामोरे जातो हीच बाब महत्वाची आहे. शेवटी एवढच सांगतो की घरातल्यांसोबत वेळ घालवा परीक्षा देण्यासोबत परीक्षा जगणंही जमेल कारण माणसाच्या परीक्षा कधीच संपत नसतात.
© गंधार वि. कुलकर्णी
दि. १० एप्रिल २०२१
No comments:
Post a Comment