Followers

Monday, July 12, 2021

घरे

घरे,
पक्ष्यांची, माणसांची आणि देवांची
उध्वस्त झालीत काल आलेल्या भूकंपात.
जमीनदोस्त झालेली अनेक घरे दिसत होती
वाऱ्याने पडलेल्या खेळण्यातल्या
पत्त्यांच्या बंगल्यासारखी.

चार भिंतीआड सुरक्षित असलेली मुले
आता लोकांच्या घोळक्यात सुरक्षित होती.
विभक्तपणे जगणारे सगळे कुटुंब
रात्री रस्त्यावर संयुक्तपणे राहिले.
मात्र वर्षभर लोकांच्या गर्दीत राहणारा देव
रात्रभर एकटाच होता मोडलेल्या मंदीरात.
नेहमीपेक्षा अधिक अंध:कारमय वाटणारी ती रात्र
रस्त्यावरील लोकसमूहाने आणि झाडांवरील पक्षीसमूहाने
घालवली विखुरलेल्या स्वप्नांचे अवशेष बघत.

दुसऱ्या दिवशी तिथे आले
काही स्वच्छ कोरे खादीचे कपडे घातलेले व्यापारी
आणि करू लागले आश्वासने व स्वप्नांचा व्यापार.
तेव्हाच शब्दांची मोठी आलीशान
घरेही त्यांनी पीडितांसाठी उभारली.

नंतर बेघर आणि निर्वासितांच्या खिशातल्या रूपयाला
वर्गणी व देणगीच्या वाटा मोकळ्या झाल्या.
त्यातूनच जिर्णोद्धार झाला पडलेल्या मंदीराचा.
देवापुढे पुन्हा भक्तांची रांग जमू लागली.
पक्षी या लोकांसारखे नसल्यामुळे
त्यांनी स्वतःच आपले नवीन घरटे बांधून घेतले.

बेघर लोकांनी खादी वस्त्रातील व्यापाऱ्यांसोबत
केला मतांचा व्यापार आणि देवाच्या नवीन घरात
जाऊन लावले व्रत-वैकल्यांचे तोरण.
पण आजही त्यांच्या पडक्या घराच्या मलब्यावर
उगवत आहे फक्त हिरवे गवत.

© गंधार कुलकर्णी
दि. ०५ मे २०२१
९१५८४१६९९८

11 comments: