कसोल कँप आणि पारूल राणा
१७ मार्चला सकाळी आम्ही हॉटेल ग्रेसमधून पोटभर नाश्ता करून पुढच्या प्रवासासाठी निघालो. खरं तर तेव्हा हॉटेल सोडवत नव्हते. पण आम्हीच स्वतःच्या मनाला पुढच्या प्रवासाचं आकर्षण दाखवून हॉटेल सोडण्यासाठी तयार केलं. आता आम्हाला शॉल कारखान्याला भेट द्यायची होती. आतापर्यंत भरपूर खरेदी आम्ही करून ठेवली होती. पण प्रवास करत असतांना एखाद्या ठिकाणी भेट देणे आणि तिथून रिकाम्या हातानी परत येणे हा नियम आम्हाला लागू होत नव्हता. त्यामुळे शॉल कारखान्यासमोर गाडी थांबली की बॅगमधील जास्तीचे पैसे पाकीटात टाकूनच खाली पाय ठेवायचा असं आम्ही मनोमन ठरवलं होतं. कारखान्यासमोर थांबण्याआधी आम्ही रस्त्यात एका पूलावर थांबलो. पूर्ण लोखंडी बांधकाम असलेला हा पूल मनालीपासून काहीशा अंतरावर होता. पूलावर हिमाचल प्रदेशातील पारंपरिक कापडी तोरण बांधलेलं होतं. आम्ही फक्त तिथे फोटो काढण्यासाठी थांबलो होतो. पण पूलावर उतरल्यावर तिथली हवा, कोवळं ऊन आणि खालून वाहणाऱ्या पाण्याचा 'खळखळ' असा आवाज यामुळे फोटोच्या विचाराचा काही क्षणांकरीता विसर पडला आणि आम्ही त्या निसर्गसौंदर्यात रमलो. सकाळच्या सूर्याचे किरणं शरीराला सौम्य ऊब देत होते तर पुलावरच्या कापडी तोरणाला उडवत येणारी थंड पहाडी हवा शरीराला गारवा देत होती. मी थोड्या वेळ गॉगल काढून डोळ्यांना त्या गार वाऱ्याचा स्पर्श होवू दिला. त्या पूलावर एकावेळी एकच गाडी जावू शकेल इतकीच जागा होती. त्यामुळे फोटो काढतांना जेव्हा एखादी गाडी यायची तेव्हा आम्ही सगळे पूलाच्या अगदी बाजूला काठावर उभं राहायचो. एक गाडी तर माझ्या जरकिनला थोडी घासून गेली. तिथेसुद्धा आम्ही खूप फोटो काढले. मयुरेशदाने तर माझा एक स्लोमोशन वीडियो काढला. तो वीडियो बघितल्यावर मला दक्षिणी सिनेमातील नायक झाल्यासारखं वाटलं.
पूलावर फोटो काढणं झाल्यावर आम्ही शॉल कारखान्याकडे निघालो. गाडी कारखान्यासमोर थांबली आणि आम्ही कारखाना बघितला तेव्हा लक्षात आलं की तो कारखाना फक्त शॉलचा नसून सगळ्याच प्रकारच्या गरम कपड्यांचा होता. तिथे विकल्या जाणारे सर्व कपडे तिथेच बनत असल्यामुळे आम्हाला बघण्यासाठी क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही भरपूर प्रमाणात बघायला मिळाली. बाबांसाठी स्वेटर व मफलर घेतल्यावर आईसाठी स्वेटर घेतांना अदितीताई आणि इंद्रायणीला सोबत घेतलं. मग विविध स्वेटरचे इंद्रायणीवर प्रयोग करून झाल्यावर आईसाठीसुद्धा स्वेटर आणि मफलर घेतलं. कोणतीही खरेदी करतांना स्त्रियांना स्वतःसोबत ठेवल्याने चांगल्या क्वालिटीचं सामान घेतल्या जातं, अशी माझी खात्री पटली. तिथे आम्ही सर्वांनीच आपल्या आई-बाबांसाठी खरेदी केली. आपण कुठेही फिरायला गेलो आणि तिथे आई-बाबांसाठी काही खरेदी केली की घरी गेल्यावर त्या वस्तू त्यांना दाखवण्याचा आनंद व उत्साह खरेदी केल्याच्या क्षणापासून वाढत जातो. असा अनेकवेळा घेतलेला अनुभव मी शॉल कारखान्यात पुन्हा घेतला.
खरेदी झाल्यावर आम्ही कसोल गावाकडे जाण्यास निघालो. कसोल हे अतिशय लहान गाव होतं आणि गावापेक्षा मोठं तिथलं मार्केट होतं. आधी आम्हाला कसोल गावाच्या पलीकडे असलेल्या गुरुद्वारा आणि राम मंदीराला भेट द्यायची होती. त्यामुळे आम्ही कसोल गाव मागे सोडून राम मंदीराजवळ थांबलो. महाराष्ट्रातील बहिरम, माहूर किंवा अमरावतीतील अंबादेवी मंदीराजवळ जशी दुकानांची गर्दी आणि यात्रा भरल्यासारखं वातावरण असतं तसं तिथे होतं. ती सर्व गर्दी पार करून आम्ही राम मंदीरात पोहोचलो. दर्शन केल्यावर गुरुद्वारा किंवा मंदीरातील लंगरमधे जेवण करण्याचं ठरलं होतं. पण गुरुद्वारातील गर्दी बघता मंदीरात जेवण करणं जास्त सोयीचं होतं. त्यामुळे आम्ही लंगरच्या ठिकाणी गेलो. स्वतःसाठी एक ताट आणि पेला घेऊन आम्ही खाली टाकलेल्या फाऱ्यांवर बसलो. लगेच अनुक्रमे भात, भाजी, वरण घेऊन लोकं आले आणि भसकन पूर्ण ताट भरून जावं अशा वेगात तिन्ही पदार्थ वाढले. सर्वांनाच खूप भूक लागली होती त्यामुळे अन्नाला नमस्कार करून पहिला घास घेतला तर वरण भयंकर गरम आहे हे हातापेक्षा जीभेला जास्त जाणवलं. भयंकर गरम पण चविष्ट असा रामाचा प्रसाद घेतल्यावर आम्ही आपापले ताटं धुवायला गेलो तर नळातून येणारं पाणीसुद्धा खूपच गरम नव्हे उकळतच होतं. जेवण झाल्यावर आम्ही खाली आलो तर त्या मंदीरातील पालखी बघितली. पालखी उचलणाऱ्या सगळ्या लोकांनी हिमाचली टोप्या घातल्या होत्या. पालखी मंदीरातील प्रत्येक देवासमोर तीन वेळा झुकत होती आणि नंतर पुढे जात होती. पुढे गुरुद्वाऱ्यासमोर असलेल्या एका दुकानातून डोक्याला बांधायला केशरी कपडा घेतला. त्या दुकानात खूप गर्दी होती. पण तरीही दुकानातील पंजाबी काकू येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाशी हसतमुखाने बोलत होत्या. मी आणि प्रथमेश मागे राहिलो होतो, बाकी सगळे पार्किंगपर्यंत पोहोचले होते. गुरुद्वाऱ्यातील तलवारींचे दुकानं बघत-बघत आम्हीसुद्धा पार्किंगपर्यंत पोहोचलो.
गाडीत बसून आम्ही सगळे कसोल कॅंपकडे निघालो. कसोल मार्केटपासून काही अंतरावर हिमट्रेक नावाची कॅंपसाइट होती. तिथे टेंटमधे आमचा एक दिवसाचा मुक्काम होता. सर्व सामान काढून उतरलो तर ६०-७० दगडी पायऱ्या खाली उतरून नदीच्या बाजूला एका सपाट जागेवर आमचे टेंट होते. तिथलं वातावरण आणि टेंट बघून उत्साह वाढत होता, पण सामान घेऊन इतक्या पायऱ्या उतरण्याचा विचार करताच उत्साह लगेच कमीसुद्धा होत होता. शेवटी आम्ही सामान घेऊन खाली उतरायला सुरवात केली. त्या सगळ्या दगडी पायऱ्या उतरून खाली पोहोचल्यावर आम्ही सगळ्या बॅग्स एका ठिकाणी ठेवल्या. आराध्य टेंटची चौकशी करायला गेला. मी, अथर्व आणि इंद्रायणी बॅग्सजवळ बसलो होतो तेव्हा आमच्या बाजूने एक मुलगी गेली. कॉलवर बोलता-बोलता म्हणाली,"Hello sir I am Parul Rana and I am a girl." तिचं हे वाक्य ऐकून आम्ही हसलो आणि अथर्व म्हणाला,"काय भैताड मुलगी आहे..." आमच्या माहितीप्रमाणे 'पारूल' हे नाव मुलीलाच देतात. आता तिच्या गावात पारूल नावाचे मुलं असतील तर गोष्ट वेगळी ! आम्हाला तीन टेंट भेटले. जावून बघितलं तर त्यात आमचं सामान किंवा आम्ही राहू शकत होतो. त्यामुळे खाली असलेल्या स्टोर रूममधे सर्वांचं सामान राहिल आणि आवश्यक तेवढी एक छोटी बॅग स्वतःसोबत टेंटमधे घ्यावी असं ठरवून आम्ही इतर लोकांकडे न बघता सगळं सामान काढायला सुरवात केली. आवश्यक ते सामान वेगळं काढून सगळेजण नदीमधल्या मोठ्या दगडांवर जावून बसलो. तिथे ठेवलेले एक-दोन खेळ खेळल्यावर नदीच्या पाण्यात फोटो काढणं सुरु झालं. इंद्रायणी, सर्वेश, आराध्य दगडांवर नाचत होते. आमच्यापासून काही दगडं सोडून बसलेला एक माणूस 'लाइव स्केचिंग' करत होता. मी थोड्यावेळ त्याला बघितलं आणि नंतर एका जागी शांत बसलो. समोर वेगात वाहणारी नदी, बाजूला मोठे दगडं आणि वाळू नंतर थोडं गवत आणि त्यात २०-२५ टेंट अशी आमच्या राहण्याची जागा होती. जस-जशी रात्र होत होती, तस-तसा पारा खाली घसरत होता.
ऋषीदादा आणि प्रथमेश मार्केटमधे जावून रंग घेवून आले. थंडी वाढत होती. नदीच्या काठावर जिथे सपाट जागा होती तिथे शेकोटी आणि छोटे स्टूल ठेवून बसण्याची व्यवस्था केली होती. शेकोटीजवळ बरेच मुलं-मुली बसले होते. आम्हीसुद्धा तिथे जावून बसलो. काही वेळानंतर तिथे मगाशी उल्लेख केलेली मुलगी 'पारूल राणा' आली आणि एका छोट्या स्टूलवर बसली. तिच्या हातात एक छोटी गिटार होती. मी सोडून आमचा पूर्ण ग्रुप रंग खेळत होता. पारूल राणाने तिथे बसलेल्या सर्वांना परिचय विचारला. "मैं अमरावती, महाराष्ट्र से हूँ" असं सांगितल्यावर तिथे बसलेल्या काहीजणांचा चेहरा एकदम खुलला. त्यात काहीजण अमरावतीचे होते तर काही पुणे व मुंबईचे मराठी भाषिक होते. त्यानंतर पारूल राणा स्वतःबद्दल सांगायला लागली. Apple Company तील स्वतःची नोकरी सोडून हिमाचल प्रदेशात फिरणे आणि येणाऱ्या प्रवास्यांसाठी कॅंप व राहण्याची व्यवस्था करणे असं तिने स्वतःचं काम सुरु केलं. रील लाइफमधे असे काही पात्र असतात की जे चांगल्या कंपनीतील नोकरी सोडून स्वतःची आवड जपतात, पण रियल लाइफमधे असे लोकं क्वचितच दिसतात त्यातली एक म्हणजे ही पारूल राणा. ती दिसायला जेवढी सुंदर होती, तेवढाच तिचा आवाजही गोड होता. काही बाबतीत मुलांनासुद्धा पुरुन उरेल अशी मुलगी म्हणजे पारूल राणा. तिच्याशी बोलल्यावर आम्हाला कळलं मगाशी आम्ही जिला 'भैताड मुलगी' समजत होतो, ती या पूर्ण कॅंप मालकिण होती. त्यानंतर ती स्वतः गिटार वाजवून गायला लागली. तिचा आवाज ऐकून इतरत्र फिरत असलेले सगळेजण तिथे येवून बसू लागले. त्यानंतर आम्ही 'आफरीन' या गाण्याची फरमाइश केली आणि तिच्यासोबत सगळेच गाऊ लागले. नंतर थोड्यावेळ आम्ही सगळे नाचलो. त्यात पुष्पा सिनेमाचे गाणे आणि ऋषीदादा आमचा कोरियोग्राफर होता.
जेवण केल्यावर प्रत्येकाने स्टोर रूममधे जावून कपडे बदलले. झोपायची तयारी झाली. एका टेंटमधे चार लोकं झोपतील असं ठरल्यावर ऋषीदादा, मयुरेशदा, चिन्मय आणि मी असे आम्ही चारजण एका टेंटमधे शिरलो. रात्री थंडीचे अस्तित्व बघता आम्ही टेंटमधे स्वेटर जरकिन घातल्यावरसुद्धा बल्ब सुरु ठेवला होता. बल्बचा उजेड एकदम चेहऱ्यावर पडत असल्यामुळे मी पहिल्यांदा रात्रभर चश्मा लावून झोपलो. हिमाचलमधे सूर्याचे किरणं सरळ बर्फावर पडतात आणि त्यावरून रिफ्लेक्ट होवून शरीरावर पडतात त्यामुळे शरीराचा झाकलेला भाग वगळता अन्य भागावर काळ्यारंगाची लेयर येते. त्यामुळे हिमाचली लोकं शरीरावर भरपूर क्रीम लावतात आणि क्रीम लावलं नाही तर शरीराचा रंग बदलतो. या रंग बदलण्याच्या प्रक्रियेचे शिकार आम्ही सगळे झालो आणि त्यात मी तर जास्तच झालो. हाच तो विचित्र परिणाम !
बाकी गोष्टी पुढील भागात...
© गंधार विश्राम कुलकर्णी
संपर्क : ९१५८४१६९९८
Jabardast 🔥🔥
ReplyDeleteहिमगाथा....❤️
ReplyDeleteमस्तच
ReplyDeleteमज्जाच मज्जा
ReplyDelete